रत्नागिरी : महाविद्यालयीन तरुणीच्या विनयभंगाची तक्रार दाखल असलेला व नुकताच जामीन मंजूर झालेला रिक्षाचालक अविनाश म्हात्रे याने गळफास घेत आत्महत्या (suicide) केल्याची घटना आज शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने रत्नागिरीत खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका तरुणीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. आपण दुपारी महाविद्यालयातून घरी जात असताना रिक्षाचालकाने आपल्याशी गैरवर्तन केल्याचे तिने या पोस्टमध्ये नमूद केले. त्याची दखल घेत पोलिसांनी या तरुणीशी संपर्क साधून तिची तक्रार दाखल करुन घेतली व दीड तासात रिक्षाचालक अविनाश म्हात्रे याला शोधून अटक करण्यात आली. दोन दिवसाआधीच त्याला जामीन मिळाला होता.
आज शनिवारी सकाळी ७ वाजता त्याचा मृतदेह तो राहत असलेल्या साईदीप गृहसंकुल, शांतीनगर, नाचणे, या इमारतीच्या टेरेसवर गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. तो पत्नी व दोन मुलांसह येथे राहतो. त्याने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला होता.
पोलिसांना माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विनीत चौधरी, प्रभारी पोलिस निरीक्षक मारुती जगताप, पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे व अंमलदार यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठवला आहे.