
आळंदी: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी (Sant Dnyaneshwar Palkhi ceremony) राज्यासह इतर राज्यातून लाखों भाविकांचा महामेळा आळंदीत जमला आहे. आज सायंकाळी चार वाजता माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्रस्थान होणार असतानाच पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक आणि झटापट झाली. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात आहे
पालखी सोहळ्यासाठी ४७ दिंड्यांना मंदिरात प्रवेश आहे. प्रत्येक दिंडीतील ७५ वारकऱ्यांना त्यात प्रातिनिधिक स्वरूपात प्रवेश दिला जातो. मात्र काही वारकरी मंदिर प्रवेश करण्यासाठी आग्रही होते. यामध्ये पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये आधी शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर हे वारकरी पोलीस बंदोबस्तातील कर्मचाऱ्यांना आणि बॅरिकेट्सना लोटून देत मंदिर प्रवेशासाठी पुढे सरकले मात्र पोलिसांनी त्यांना अडवले असता त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला आणि यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला. यानंतर थोड्या वेळात प्रकरण शांत करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला मात्र हजारोच्या संख्येने असलेले वारकरी मात्र चांगलेच आक्रमक झाले. दरम्यान काही वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून मंदिर परिसरामध्ये पोलिसांनी अधिक बंदोबस्त वाढवला आहे.