बालासोर : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या तीन गाड्यांच्या भीषण अपघातात २३८ जण मरण पावले असून, ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना बालासोरसहित विविध ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
सुरूवातीला या अपघातातील मृतांची संख्या ५० आणि नंतर ७० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. परंतु रात्री ही संख्या वाढून २०७ वर पोहोचली आणि जखमींची संख्या ९०० झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु अद्यापही बचावकार्य सुरु असून यातील मृतांचा आकडा वाढला आहे. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी वृत्ताला दुजोरा देत यात २३३ जणांचा मृत्यू तर ९०० प्रवासी जखमी झाल्याचे सांगितले.
पंतप्रधान, राष्ट्रपतींना तीव्र दु:ख
अपघातात झालेल्या प्राणहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश पंतप्रधान मोदी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले आहेत.