हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपल्या महत्त्वपू्र्ण सहभागाबद्दल नागरिकांना संवेदनशील करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. "पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. दररोज एक मिनीट जर प्रत्येक नागरिकाने दिला तर पर्यावरणाचा -हास होणार नाही व समतोल राखला जाईल. तसंच आपण आज ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज असे दुष्परिणाम अनुभवतोय त्यातून थोडासा दिलासा मिळेल", असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
बीच क्लीन-अप मध्ये सहभागी झाल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिनिधींचे आभार मानले आणि या परिषदेने आपल्या पृथ्वीच्या संवर्धनासाठी आपल्या सर्वांना एकत्र आणले आहे, असं ते म्हणाले. पुढे अभिमानाने संत ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आठवून आपली पृथ्वी मानवी जीवनासाठी वरदान असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. आपण दररोज करत असलेलं प्रत्येक काम हे पर्यावरणपूरक असल्याची खात्री आपण स्वतःला दिली पाहिजे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांनी २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत मिशनवरही प्रकाशझोत टाकला आणि या मिशनमुळे देशभरातील बहुतेक गावे आणि शहरे स्वच्छतेकडे एक पाऊल पुढे टाकत आहेत, असं ते म्हणाले. त्यानंतर राज्य सरकारने पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी काही कार्यक्रम आधीच सुरू केले असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं.