साईभक्तांसाठी संस्थानने घेतला मोठा निर्णय
शिर्डी : शिर्डी येथील साईबाबा मंदिरात जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. दरदिवशी मोठ्या संख्येने भाविक शिर्डी येथे साईचरणी लीन होतात. या साईभक्तांना साई मंदिरात जाताना आता हार, फुल, प्रसाद नेता येणार आहे. तसेच याठिकाणी होणारी भक्तांची लूटमार थांबवण्यासाठी साई संस्थानमार्फत भाविकांना रास्त दरात हार-फुलांची विक्री केली जाणार आहे.
साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने ठराव करत साई मंदिरात भाविकांना हार फुल प्रसाद घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच साई संस्थानमार्फत भाविकांना रास्त दरात फुलांची विक्री केली जाणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडून खरेदी करून मंदिराच्या प्रांगणात भाविकांना फुले उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. त्यामुळे साई भक्तांची लूट थांबवून आता शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे.
दरवर्षी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी कोट्यावधी भाविक येत असतात. दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या श्रद्धेचा आणि भावनांचा आधार घेत व्यावसायिक तसेच विक्रेते हार, फुले आणि प्रसाद अशा पुजा साहित्याच्या माध्यमातून त्यांना आर्थिक लुबाडतात. दोनशे रुपयांची फुल माळा दीड ते दोन हजार रुपयांना विकून भाविकांची लूट करतात. अशा अनेक तक्रारी साई संस्थानकडे आल्या होत्या.
याची गंभीर दखल घेत आता साई संस्थानमार्फत भाविकांना रास्त दरात फुलांची विक्री केली जाणार असल्याने भाविकांची होणारी लूट आता थांबणार आहे. या निर्णयाचे साईभक्तांमधून स्वागत केले जात आहे.