दादाहो! ही तर विश्वभगिनी; मनसेने उडवली अंधारेंची खिल्ली

  288

राज ठाकरे यांना पाठवलेल्या सुषमा अंधारे यांच्या पत्राला मनसेचे खरमरीत प्रत्युत्तर


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पाठवलेल्या पत्राची खिल्ली उडवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून खरमरीत प्रत्युत्तर देण्यात आले आहे.


उष्माघाताच्या दुर्घटनेप्रकरणी सुषमा अंधारेंनी पत्र लिहित राज ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्यावर आता विश्वभगिनी आपण जाणूनबुजून करुन घेतलला छोटासा गैरसमज दूर करण्याचा हा छोटासा प्रयत्न करत असल्याचे म्हणत मनसे नेते योगेश खैरे यांनी सुषमा अंधारेंना पत्र लिहित मार्मिक फटकारे लगावले आहेत.


योगेश खैरे पत्रात म्हणतात, “आपलं तथाकथित खरमरीत पत्र वाचायला मिळालं. त्यामुळे आपण जाणूनबुजून करून घेतलेला गैरसमज दूर करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. मला खात्री आहे तो दूर होणार नाही, तरीही हा प्रयत्न गोड मानून घ्यावा…!


आपण खरंतर अतिशय सजग उपनेत्या आहात. तरीही आपल्याला राजसाहेब ठाकरेंनी चार दिवसांनंतर नव्हे तर या दुर्घटनेच्या दुसऱ्याच दिवशी खारघर दुर्दैवी घटनेसंदर्भात सर्वांनाच कसं सुनावलं होतं हे तुम्हाला ऐकू आलं नाही हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला. असो, तरीही इंटरनेटचे हे जग असल्याने आपल्याला ती पत्रकार परिषद आपल्याला व्यस्त कामातून वेळ मिळाला तर पुन्हा इंटरनेटद्वारे पाहता येईल. आणि बऱ्याच बाबींची उकल आपल्याला होणार असल्याचा विश्वास खैरेंनी या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केला.


कुठल्याही दुर्दैवी अपघाती किंवा निसर्गनिर्मित घटनेचे राजकारण करणे योग्य नाही असा राजसाहेबांच्या सांगण्याचा उद्देश होता. योग्य आकलन केलेत तर नक्की आपल्या सारख्या सुज्ञ व्यक्तीच्या ते लक्षात येईल.


कोरोना काळात लोकांचा जीव जात असताना कुठं कुठं कसा भ्रष्टाचार होत होता, कोविड सेंटरची कंत्राटं कुणाला कशी दिली गेली, याची माहिती नक्की मातोश्रीतून घ्यावी, असा सल्लाही त्यांनी या पत्रामधून अंधारेंना दिला आहे.


तसेच उन्हात, एवढ्या लोकांना न बोलवता कार्यक्रम सभागृहात करता आला असता हे राजसाहेबांनी दुसऱ्या दिवशीच सांगितले होते. कदाचित आपण सोईस्करपणे ऐकले नसेल. शिंदे-फडणवीस सरकारने राजकीय उद्देश ठेवून तो कार्यक्रम केला असे आपल्याला वाटते, म्हणून आम्हीही त्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेचा राजकारणासाठी उपयोग करणार असा आपल्या म्हणण्याचा अर्थ दिसत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.



मनसे नेते योगेश खैरे यांचे पत्र 'जसेच्या तसे'...


प्रति,
विश्वभगिनी
सुषमा अंधारे


आपलं तथाकथित खरमरीत पत्र वाचायला मिळालं. त्यामुळे आपण जाणूनबुजून करून घेतलेला गैरसमज दूर करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. मला खात्री आहे तो दूर होणार नाही तरीही हा प्रयत्न गोड मानून घ्यावा !


आपण खरंतर अतिशय सजग उपनेत्या आहात... तरीही आपल्याला मा. राजसाहेब ठाकरेंनी चार दिवसांनंतर नव्हे तर या दुर्घटनेच्या दुसऱ्याचं दिवशी खारघर दुर्दैवी घटनेसंदर्भात सर्वांनाच कसं सुनावलं होतं हे ऐकू आलं नाही हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला. असो.... तरीही इंटरनेटचं जग असल्याने आपल्याला ती पत्रकार परिषद आपल्याला व्यस्त कामातून वेळ मिळाला तर पुन्हा इंटरनेटद्वारे पाहता येईल. आणि बऱ्याच बाबींची उकल आपल्याला होईल.


- कुठल्याही दुर्दैवी अपघाती किंवा निसर्गनिर्मित घटनेचं राजकारण करणं योग्य नाही असा मा.राजसाहेबांच्या सांगण्याचा उद्देश होता. योग्य आकलन केलंत तर नक्की आपल्या सारख्या सुज्ञ व्यक्तीच्या ते लक्षात येईल.
कोरोना काळात लोकांचा जीव जात असताना कुठं कुठं कसा भ्रष्टाचार होत होता, कोविड सेंटरची कंत्राटं कुणाला कशी दिली गेली याची माहिती नक्की मातोश्रीतून घ्यावी !


- उन्हात, एवढ्या लोकांना न बोलवता कार्यक्रम सभागृहात करता आला असता हे मा.राजसाहेबांनी दुसऱ्या दिवशीच सांगितलं होतं. कदाचित आपण सोईस्करपणे ऐकलं नसेल.


- शिंदे फडणवीस सरकारने राजकीय उद्देश ठेवून तो कार्यक्रम केला असं आपल्याला वाटतं.... म्हणून आम्हीही त्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेचा राजकारणासाठी उपयोग करणार असा आपल्या म्हणण्याचा अर्थ दिसतोय !


- मंदिरे, हिंदु देवदेवता याबाबत आपल्या मनात कायमच आकस राहिलेला आहे त्यामुळे त्या विषयात आपलं समुपदेशन करण्याची कदाचित आमची योग्यता नसेल त्यामुळे ते करण्याचा अयशस्वी प्रयत्न काही करत नाही !


- देशपांडेना खरचटलं नाही पण भ्याड हल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्या घटनेचा साधा निषेध करण्याची राजकीय साधनसुचिता आपण दाखवली नाही याचं खरंच वाईट वाटतं. असो... मा.राजसाहेब दुसऱ्याच दिवशी सकाळी दुर्घटनेतील श्री सदस्यांची विचारपूस करायला पोहचले होते ही तातडीची भेट वाटत नसेल तर दुर्दैव आहे. याला राजकारण करणं म्हणतात !!


- कोरोना काळात सर्वाधिक रुग्ण संख्या महाराष्ट्रात वाढत असताना हा कसला पॅटर्न होता हे कळायला काही मार्ग नाही.
असो....


आपल्यासारखा विश्वरुपी नसला तरीही आपला बंधू,
योगेश खैरे

Comments
Add Comment

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून

जिओमध्ये गुंतवणूक ही माझ्या आयुष्यातली मोठी रिस्क : मुकेश अंबानी

रिलायन्स आता डीप-टेक, अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनण्याच्या मार्गावर मुंबई  : टेलिकॉम क्षेत्रातील

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे, परराष्ट्र मंत्र्यांकडे आ. निलेश राणे यांची मागणी

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Madhuri Misal : नागरिकांना मिळणार दिलासा ! मिळकतकरासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्यसरकारकडे पाठवावा...

पुणे :  मिळकत करावर दंड आणि व्याज लावला जात असल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नागरिकांसाठी मोठा निर्णय

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांना भरवा लागणार युजर शुल्क

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार या प्रतिक्षेत गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईकर आहेत. परंतू