मुंबई : राज्यातील विविध ग्रामपंचायतीमधील सदस्य आणि सरपंच यांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. आज राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. १८ मे २०२३ रोजी मतदान होणार आहे.
राज्यभरातील सुमारे २ हजार ६२० ग्रामपंचायतीमधील ३ हजार ६६६ सदस्य आणि १२६ थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवणुका होणार आहेत. त्यासाठी १८ मे २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे आज येथे देण्यात आली आहे. यासाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झालेली आहे.
निधन, राजीनामा, सदस्यत्व रद्द झालेले अथवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होत आहे. यासाठी नामनिर्देशनपत्र (उमेदवारी अर्ज) २५ एप्रिल ते २ मे २०२३ या कालावधीत दाखल करता येणार आहेत. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी ३ मे २०२३ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे ८ मे २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. १८ मे २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. तर नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १९ मे २०२३ रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे.