एखाद्या मोठ्या वृक्षाच्या छायेत अन्य वृक्षांचे बीज रुजत नाही. सृष्टी नियमच आहे. मात्र प्रत्येक नियमाला अपवादही असतो. पार्श्वगायनाच्या क्षेत्रात सुमनताई या अशाच अपवाद ठरल्या. नूरजहाँ, सुरैय्या, शमशाद बेगम, लता, आशा यासारख्या डेरेदार वृक्ष असलेल्या नंदनवनात, चिरकाल, तजेलदार निर्मळ सुवास देणाऱ्या बकुळ सुमनांचं हे झाड, केवळ रुजलंच नाही, तर बहरून आलं. एव्हरेस्ट शिखर सर करणाराच फक्त उत्तम गिर्यारोहक असतो असं नाही, कारण तुलनेनं थोड्या कमी उंचीची शिखरं काबीज करायलाही तशीच गुणवत्ता असावी लागते. व्यावसायिक उंची अथवा गाण्यांची संख्या या निकषांचं एव्हरेस्ट जरी सुमनताईंनी गाठलं नसलं, तरी सुकून गेल्यानंतरही ज्याचा सुवास दरवळत राहतो आणि माळलाही जातो, अशा बकुळ फुलांची त्या माळ ठरल्या. रसिक आणि त्यांच्या प्रेमाच्या चर्चा, त्यांच्याच ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर’ या गाण्याप्रमाणे आजही सातत्यानं गुणग्राहकांच्या मुखी आहेत. आता, तर ‘पद्मभूषण’रूपी राजमुद्रा विलसत असल्यानं, पुरस्कार हेच गुणवत्तेचं प्रमाण मानणाऱ्यांनाही हा सुमनहार गळ्यात मिरवायला हरकत नसावी.
सुमनताईंच्या आणि लतादीदींच्या आवाजात विलक्षण साम्य आहे. अस्सलशी साधर्म्य हे कमअस्सल कलाकारासाठी तर वरदान ठरू शकतं. मात्र तेवढ्याच ताकदीच्या दुसऱ्या एखाद्या अव्वल कलाकारासाठी ते अस्मितेच्या संकटासारखं घातक ठरतं. सुमनताईंच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. त्यांच्या उगवतीच्या समयी लतारूपी स्वरपौर्णिमा भर यौवनात होती. त्यामुळे सुमनताईंच्या निर्विवाद गुणवत्तेचं चीज करण्यास मायानगरी तोकडी पडली. न्याय्य ते त्यांना देण्यास अवकाशच कमी पडलं. त्यांची स्वतःची अशी शैली असूनही आवाजातल्या साधर्म्यामुळे अनेकदा संगीतकार त्यांना लता मंगेशकर यांच्यासारखं गायला प्रवृत्त करत. त्यामुळे स्वशैली असूनही, हुबेहूब लतासारखी गाणारी, लताची क्लोन, प्रती लता वगैरे विशेषणं (?) त्यांना चिकटू लागली. बरं त्यातही लता उपलब्ध असेल, तर प्रती लताला गाणी का द्यायची, असा विचारही संगीतकार, निर्माते करीत, असे सगळे विसंवादी सूर हे सुमन रागाचे वादी-संवादी स्वर झाले होते. एकूण परिस्थिती त्यांच्यासाठी फारच कठीण होती. कारण लताजींना, तर स्वतःचंच गाणं गायचं असायचं. मात्र सुमनजींना लतासारखं गाण्याचं दडपण बाळगत गाणं गावं लागत असे. हेमंत कुमार यांनी संगीत दिलेल्या ‘चांद’ या चित्रपटासाठी शैलेंद्र यांच्या लेखणीतून झरलेलं ‘कभी आज कभी कल कभी परसो ऐसे ही बीते बरसों’ हे समदर्शी सुमन लतेच एकमेव युगुलगीत
ऐकताना या एक ‘सूर’त्वाची प्रचिती येते.
कभी आज कभी कल कभी परसों
हे नृत्यगीत हेलन आणि शीला वाज यांच्यावर चित्रित झालं आहे. कुणी कुणाला आवाज दिला, हे ओळखणे निव्वळ अशक्य आहे किंवा आता फक्त सुमनताईंनाच शक्य आहे. शीला-लता आणि हेलन-सुमन असं यमक मी तरी जुळवलं आहे. व्यासंगी याचा योग्य निर्णय करू शकतील. ‘पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना, कुण्डे कुण्डे नवं पयः, जातौ जातौ नवाचाराः, नवा वाणी मुखे मुखे॥’ या सुभाषिताला अनुसरून या दोन्ही समगुणी गायिकांमधल्या संबंधांवर निरनिराळी भाष्य झाली. सुमनताईंच्या पहिल्याच गाण्याच्या वेळी (मंगू चित्रपट) लतादीदींसोबत झालेल्या सुसंवादाच्या, ‘आठवणीच्या चिंचा गाभुळ’ चाखायला देतात. लतादीदींच्या गाण्यांनी सुमनच्या मनात घर केलं होतं. आपल्या बालसखीबरोबर घराच्या गच्चीवर सततच त्यांच्या मैफली घडत असत. योगायोग पाहा प्रथम हिंदी आणि नंतर मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पणातली गाणी, तर रेकॉर्ड झाली. मात्र चित्रपट आलेच नाहीत. सुमन कल्याणपूर यांची सांगितिक कारकीर्द मुख्यत्वे तिरंगी आहे. एक तर हिंदी पार्श्वगायन, नंतर मराठी वगळता अन्य भाषेतील पार्श्वगायन आणि सुगम संगीत आणि कदाचित सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे मराठी, हिंदी पार्श्वगायन हे त्यांच्याकडे केवळ गुणवत्तेच्या जोरावर कुणालाही काम न मागता विनासायास चालत आलं. मात्र ते राजकारणानं ग्रासलं गेलं. बंगाली, गुजराती, पंजाबी, कन्नड, असमिया, मैथिली, राजस्थानी, ओडिया अशा अन्य भाषांतही त्यांनी गायलेली कितीतरी गीतं गाजली. गुजरात, पंजाब राज्य सरकारकडून सलग पुरस्कृतही करण्यात आलं. अखेरीस हरदास जसा मूळ पदावर येतो तद्वतच असं लक्षात येतं की, सुमनताईंचा आवाज नुसताच गोड नाही, तर त्यात भाव प्रकट करण्याची नैसर्गिक क्षमता आहे. त्यांच्या गायकीच्या प्राजक्त सुमनगंधाची मोहिनी निश्चितच पद्मभूषणावह असून विश्वामित्र बाण्याच्याही एखाद्याचं अरसिकत्व भंग करेल, अशी लाघवी आहे.
-नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
(लेखक डी. डी. न्यूज, (दूरदर्शन) नवी दिल्ली येथे उपसंचालक या पदावर कार्यरत आहेत.)
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…