विरार (प्रतिनिधी) : केंद्र शासन स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या अनुषंगाने राज्यात स्वच्छ महाराष्ट्र (नागरी) अंमलबजावणी सुरू असून; घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ मधील नियम १५ पी अंतर्गत उद्यानांत निर्माण होत असलेल्या पालापाचोळ्यातून खतनिर्मिती करणे आवश्यक केल्याने वसई-विरार महापलिकेने उद्यानांतील पालापाचोळा व कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.
या खतनिर्मितीकरता पालिका फोल्डेबल कम्पोस्ट बॅग खरेदी करणार असून याकरता तीन लाख रुपये खर्च करणार आहे. वसई-विरार महापालिका क्षेत्रात १५२ उद्याने आहेत. त्यात गरजेनुसार फोल्डेबल कम्पोस्ट बॅग ठेवून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. या प्रति बॅगकरता पालिकेने दोन हजार रुपये इतका दर निश्चित केलेला आहे. त्यानुसार १५० कम्पोस्ट बॅगकरता पालिकेला अंदाजित तीन लाख रुपये इतका खर्च येणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षणाच्या टूलकिटमध्ये नमूद केल्याप्रमाणे या कामाकरता २५० गुण असल्याने महापालिकेच्या मानांकन वाढीसाठी त्याची मदत होणार आहे. त्यासाठी हा खतनिर्मिती प्रकल्प पालिकेला आवश्यक असल्याचे पालिकेने म्हटले आहे.