विरार (वार्ताहर) : रस्ता रुंदीकरणासाठी चक्क तलाव आठ ते दहा फूट बुजवून माती भराव करून रस्ता बनवण्याचे काम वसई-विरार महापालिकेने सुरू केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे नेहमी पर्यावरणाच्या नावाखाली आवाज उठवणाऱ्या हरित पट्ट्यातच हा प्रकार सुरु असताना पर्यावरणप्रेमींकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विरार पूर्वेकडील नंदाखाल गावात चर्चशेजारील पुरातन तलाव आहे.
रस्ता रुंदीकरण करण्यासाठी एका बाजूने जवळपास ८ ते १० फूट बुजवून त्यावर माती भराव टाकून रस्ता तयार करण्याचा प्रताप महापालिका बांधकाम विभागाने सुरू केल्याचे दिसत आहे. ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी उपसा करून हे काम सुरू असून महापालिकेच्या या प्रकारावर परिसरातील पर्यावरणप्रेमी व सजग नागरिक गप्प का?, असा सवाल भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी उपस्थित केला आहे.
काही विशिष्ट लोकांना फायदा पोहोचण्यासाठी पुरातन तलाव बुजवण्यात येत असल्याची भावना व रोष व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, वसईच्या पश्चिम पट्ट्यातील बावखले, तलाव आणि विहिरींनी येथील पाण्याचे भूगर्भातील स्त्रोत कायम ठेवण्याचे काम केले आहे. म्हणूनच बावखल बचाव मोहीम या परिसरात राबवण्यात आली आहे.
एखाद्याने बावखल बुजवून घेर बांधण्याचे काम हाती घेतले तरी मोठा विरोध केला जात असल्याचे पहावयास मिळते. असे सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेल्या पर्यावरणप्रेमींच्या गावातच पुरातन तलाव चक्क एका बाजूने बुजवून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु असताना त्यावर कुणीही बोलताना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.