बुमराला रोखण्याचे चेन्नई समोर आव्हान

ज्योत्स्ना कोट-बाबडे


मुंबई : यंदा खराब फॉर्मशी झुंज देत असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांचा सामना आज वानखेडेवर होणार आहे. चेन्नईसाठी त्यांचे लक्ष्य स्पर्धेत टिकून राहणे असेल, तर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबईकडे गमावण्यासारखे काहीच नाही. मुंबई आता प्रतिष्ठेसाठी खेळेल, तर तांत्रिकदृष्ट्या चेन्नई अजूनही स्पर्धेत असल्यामुळे ते विजय मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. दरम्यान चेन्नईला विजय मिळवण्यासाठी घातक गोलंदाज जसप्रित बुमराला रोखण्याचे आव्हान आहे.


चेन्नई आणि मुंबई या आयपीएलमधील दोन सर्वात यशस्वी संघांसाठी यंदाचा हंगाम निराशाजनक आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला उर्वरित सामने जिंकण्याची इच्छा आहे. त्याचवेळी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईला पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबईवर पुन्हा एकदा पलटवार करायला आवडेल.


चेन्नईचे ८ गुण आहेत आणि ३ सामने बाकी आहेत. प्लेऑफमध्ये चेन्नई अशा स्थितीत आहे की, त्यांना १४ गुण मिळविण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकायचे आहेत आणि त्यांना उर्वरित संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. उर्वरित ४ संघांचे १४ गुण असल्याने प्रत्येक संघांसाठी धावगतीही महत्त्वाची ठरणार आहे.


चेन्नईने गत सामन्यात दिल्लीचा ९१ धावांनी पराभव केला होता आणि त्यांना या सामन्यातदेखील अशीच कामगिरी कायम राखण्याची अपेक्षा आहे. सलामीवीर डेव्हन कॉनवे उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याने सलग तीन अर्धशतके झळकावली आहेत. त्याने दिल्लीविरुद्ध ८७ धावा केल्या. त्याला सलामीचा जोडीदार रुतुराजकडून पाठिंबा अपेक्षित असेल.


चेन्नईसाठी चिंतेची बाब म्हणजे जाडेजा आता दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडला आहे. हा मोसम रवींद्र जडेजासाठीही दुःस्वप्नासारखा होता व त्याने मध्येच कर्णधारपद सोडले; परंतु पुन्हा कर्णधारपदी आलेल्या धोनीने मागील काही सामन्यांत आपली ‘फिनिशिंग स्टाईल’ दाखवत विजय मिळवला आहे. गत सामन्यात सीएसकेने दिल्लीला ११७ धावांत गुंडाळले. त्यात मोईन अलीने विस्फोटक गोलंदाजी करत तीन बळी घेतले, मुंबईसमोर त्याला सामोरे जाण्याचे आव्हान असेल, तर युवा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी आणि सिमरनजीत सिंग यांनीही चांगली कामगिरी केली. यांव्यतिरिक्त किंग्जसाठी ड्वेन ब्राव्हो व फिरकीपटू महिष तिक्षणाही धारदार गोलंदाजी करून सामना फिरवू शकतो.


मुंबईसाठी उर्वरित सामने औपचारिकता असून त्यांना पारंपरिक प्रतिस्पर्ध्याला हरविण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. कर्णधार रोहित शर्मा (२०० धावा), इशान किशन (३२१ धावा) यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल. मुंबईच्या मधल्या फळीलाही कामगिरी सुधारावी लागणार आहे. सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे बाहेर आहे. अशा स्थितीत तिलक वर्मा, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग आणि किरॉन पोलार्ड यांच्यावर जबाबदारी असेल.


कोलकाताविरुद्धच्या सामन्यात ५ विकेट्स घेऊन जसप्रीत बुमराने कारकिर्दीतील भन्नाट गोलंदाजी केली आणि त्याला इतर गोलंदाजांकडून साथ मिळण्याची अपेक्षा आहे. डॅनियल सॅम्स, रिले मेरेडिथ, कुमार कार्तिकेय सिंग यांना चेन्नईच्या फलंदाजांवर अंकुश ठेवावा लागेल आणि निदानपक्षी चाहत्यांसाठी हा सामना जिंकत या हंगामात गुणतालिकेत सन्मानजनक स्थानी झेप घ्यावी लागेल.


ठिकाण : वानखेडे स्टेडियम, मुंबई वेळ : रात्री ७.३० वाजता

Comments
Add Comment

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर

भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात