ज्योत्स्ना कोट-बाबडे
मुंबई : यंदा खराब फॉर्मशी झुंज देत असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांचा सामना आज वानखेडेवर होणार आहे. चेन्नईसाठी त्यांचे लक्ष्य स्पर्धेत टिकून राहणे असेल, तर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबईकडे गमावण्यासारखे काहीच नाही. मुंबई आता प्रतिष्ठेसाठी खेळेल, तर तांत्रिकदृष्ट्या चेन्नई अजूनही स्पर्धेत असल्यामुळे ते विजय मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. दरम्यान चेन्नईला विजय मिळवण्यासाठी घातक गोलंदाज जसप्रित बुमराला रोखण्याचे आव्हान आहे.
चेन्नई आणि मुंबई या आयपीएलमधील दोन सर्वात यशस्वी संघांसाठी यंदाचा हंगाम निराशाजनक आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला उर्वरित सामने जिंकण्याची इच्छा आहे. त्याचवेळी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईला पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबईवर पुन्हा एकदा पलटवार करायला आवडेल.
चेन्नईचे ८ गुण आहेत आणि ३ सामने बाकी आहेत. प्लेऑफमध्ये चेन्नई अशा स्थितीत आहे की, त्यांना १४ गुण मिळविण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकायचे आहेत आणि त्यांना उर्वरित संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. उर्वरित ४ संघांचे १४ गुण असल्याने प्रत्येक संघांसाठी धावगतीही महत्त्वाची ठरणार आहे.
चेन्नईने गत सामन्यात दिल्लीचा ९१ धावांनी पराभव केला होता आणि त्यांना या सामन्यातदेखील अशीच कामगिरी कायम राखण्याची अपेक्षा आहे. सलामीवीर डेव्हन कॉनवे उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याने सलग तीन अर्धशतके झळकावली आहेत. त्याने दिल्लीविरुद्ध ८७ धावा केल्या. त्याला सलामीचा जोडीदार रुतुराजकडून पाठिंबा अपेक्षित असेल.
चेन्नईसाठी चिंतेची बाब म्हणजे जाडेजा आता दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडला आहे. हा मोसम रवींद्र जडेजासाठीही दुःस्वप्नासारखा होता व त्याने मध्येच कर्णधारपद सोडले; परंतु पुन्हा कर्णधारपदी आलेल्या धोनीने मागील काही सामन्यांत आपली ‘फिनिशिंग स्टाईल’ दाखवत विजय मिळवला आहे. गत सामन्यात सीएसकेने दिल्लीला ११७ धावांत गुंडाळले. त्यात मोईन अलीने विस्फोटक गोलंदाजी करत तीन बळी घेतले, मुंबईसमोर त्याला सामोरे जाण्याचे आव्हान असेल, तर युवा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी आणि सिमरनजीत सिंग यांनीही चांगली कामगिरी केली. यांव्यतिरिक्त किंग्जसाठी ड्वेन ब्राव्हो व फिरकीपटू महिष तिक्षणाही धारदार गोलंदाजी करून सामना फिरवू शकतो.
मुंबईसाठी उर्वरित सामने औपचारिकता असून त्यांना पारंपरिक प्रतिस्पर्ध्याला हरविण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. कर्णधार रोहित शर्मा (२०० धावा), इशान किशन (३२१ धावा) यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल. मुंबईच्या मधल्या फळीलाही कामगिरी सुधारावी लागणार आहे. सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे बाहेर आहे. अशा स्थितीत तिलक वर्मा, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग आणि किरॉन पोलार्ड यांच्यावर जबाबदारी असेल.
कोलकाताविरुद्धच्या सामन्यात ५ विकेट्स घेऊन जसप्रीत बुमराने कारकिर्दीतील भन्नाट गोलंदाजी केली आणि त्याला इतर गोलंदाजांकडून साथ मिळण्याची अपेक्षा आहे. डॅनियल सॅम्स, रिले मेरेडिथ, कुमार कार्तिकेय सिंग यांना चेन्नईच्या फलंदाजांवर अंकुश ठेवावा लागेल आणि निदानपक्षी चाहत्यांसाठी हा सामना जिंकत या हंगामात गुणतालिकेत सन्मानजनक स्थानी झेप घ्यावी लागेल.
ठिकाण : वानखेडे स्टेडियम, मुंबई वेळ : रात्री ७.३० वाजता
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…