रत्नागिरी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी प्लास्टिकबंदी असतानाही कोणतीच कारवाई केली जात नसल्याने प्लास्टिकचा कचरा गावभर पसरलेला दिसतो. तीच स्थिती रत्नागिरी शहराची झाली आहे. रत्नागिरी शहरातील नगर परिषदेने व मागील सत्ताधाऱ्यांनी मोठा गाजावाजा करून साळवी स्टॉप येथे घनकचरा प्रकल्प प्रोसेसिंग युनिट सुरू असल्याची बतावणी केली. मात्र प्रत्यक्षात या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसून येतो. त्याची विल्हेवाट का लावली जात नाही. तेथे साचलेल्या कचऱ्यामुळे या परिसरातील इमारती आणि उंच वाढलेल्या झाडावर बगळेच बगळे पहायला मिळतात. हे बगळे अनेकवेळा पाण्याच्या टाकीवर जाऊन बसतात तेथेच पिण्याच्या पाण्यात बगळ्यांची विष्ठा पडते आणि ती विष्ठा संपूर्ण शहरभर पिण्याच्या पाण्यातून पसरते की काय? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.