पहिल्या दिवसअखेर भारत ४ बाद २२१

सुनील सकपाळ


मुंबई : सलामीवीर मयांक अगरवालच्या (खेळत आहे १२०) नाबाद शतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या दिवसअखेर शुक्रवारी पहिल्या डावात ४ बाद २२१ धावा केल्या. पावसामुळे मैदान ओले असल्याने जवळपास दोन तास उशिराने सामना सुरू झाला. त्यामुळे २० षटकांचा खेळ वाया गेला.


मयांकने अख्खा दिवस खेळून काढताना वैयक्तिक खेळ उंचावला. शिवाय तीन अर्धशतकी भागीदाऱ्या रचल्या.



मयांक अगरवालचे नाबाद शतक


भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मयांकने शुबमन गिलने दमदार सुरुवात करताना ८० धावांची सलामी दिली. २८व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर डावखुरा फिरकीपटू अजाझ पटेलने गिलला रॉस टेलरकरवी झेलबाद केले. गिलने ७१ चेंडूंत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४४ धावा केल्या. त्यानंतर त्याच्या पुढच्याच षटकात चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली बाद झाले. दोघांनाही खाते उघडता आले नाही. पुजारा पाच चेंडू खेळून त्रिफळाचीत झाला. विराट पायचीत झाला. तो चार चेंडू मैदानावर टिकला. अनुभवी फलंदाज पुजारा आणि कोहली बाद झाल्यानंतर मयांकने मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरसह चौथ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी करताना संघाला सावरले. चहापानाआधी ही जोडी फोडण्यात एजाझला यश आले. त्याने श्रेयसला (१८) यष्ट्यांमागे टॉम ब्लंडेलकरवी झेलबाद केले.


चहापानानंतर मयांकने वृद्धिमान साहासह पाचव्या विकेटसाठी ६१ धावा जोडताना भारताला दोनशेपार नेले. तसेच वैयक्तिक चौथे शतकही पूर्ण केले. पहिल्या दिवसअखेर भारताने ७० षटकात ४ बाद २२१ धावा केल्या असून मयंक १४ चौकार आणि ४ षटकारांसह १२० तर वृद्धिमान साहा २५ धावांवर खेळत आहेत. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाझ पटेलने भारताच्या चारही विकेट घेतल्या. त्याने विराट कोहलीसह शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यर यांना बाद केले.



कसोटी दोन, कर्णधार चार


विद्यमान कसोटी मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे दोन सामन्यांत चार कॅप्टन पाहायला मिळाले. पहिल्या कसोटीमध्ये विराट कोहलीने विश्रांती घेतल्याने उपकर्णधार अजिंक्य रहाणेने हंगामी नेतृत्वाची धुरा सांभाळली. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन होता. दुखापतीचे कारण पुढे करताना दुसऱ्या कसोटीमध्ये हंगामी कर्णधार रहाणेला संघाबाहेर ठेवले. भारताचा नियोजित कॅप्टन कोहली मुंबईत परतला, पण दुखापतीमुळे विल्यमसन खेळू शकला नाही. त्यामुळे मुंबई कसोटीत कोहली आणि टॉम लॅथमने आपापल्या संघांचे नेतृत्व केले.



१३ डावांनंतर तीन आकडी मजल


मयांकचे १६ सामन्यांतील हे चौथे शतक आहे. यापूर्वी, इंदूरमध्ये (१४ नोव्हेंबर २०१९) बांगलादेशविरुद्ध त्याने द्वि(शतकी) खेळी केली होती. त्यानंतर १३ डावांमध्ये अगरवालला केवळ एक अर्धशतक झळकावता आले. विद्यमान मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध (१३ आणि १७ धावा) त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. मात्र, मुंबईत नाबाद शतक ठोकताना मयांकने दमदार पुनरागमन केले.



शून्यावर बाद झालेल्या विराटची आदळआपट


पुनरागमन करणारा भारताचा नियोजित कर्णधार विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. तिसऱ्या अंपायर्सच्या निर्णयानंतरही पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याने राग व्यक्त करताना चौकाराच्या सीमारेषेरवर जोराने बॅट जोरात आपटली.


चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि ४ चेंडू खेळूनही त्याला खाते उघडता आले नाही. फिरकीपटू एजाज पटेलने त्याला पायचीत केले. विराटने मैदानावरील पंचांच्या निर्णयाला आव्हान देताना डीआरएसचा वापर केला.


चेंडू त्याच्या बॅटला आणि पॅडला एकाच वेळी लागल्याचे रिव्ह्यूमध्ये आढळून आले. यामुळे तिसऱ्या अंपायरनेही निर्णय कायम ठेवला. अंपायर्सच्या या निर्णयावर सोशल मीडियावर काही चाहते चांगलेच संतापले. विराटच्या बाद होण्याशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. काही टीव्ही समालोचकांनीही विराटचे समर्थन केले आणि पंचांच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. युएईत झालेल्या आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपनंतर विराटने विश्रांती घेतली होती. कानपूर कसोटीतही तो खेळला नव्हता.

Comments
Add Comment

Pakistan Player : खेळाडू की हैवान; पाकिस्तानी खेळाडूंकडून मैदानाबाहेर महिलांचा विनयभंग

आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकातून पाकिस्तानचा संघ बाहेर पडला असला, तरी आता एका नव्या वादामुळे पाकिस्तानी खेळाडू

T20 : दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरली चोकर्स, फिन एलनचे वादळी शतक आणि न्यूझीलंडची दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक

कोलकाता  : न्यूझीलंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला सहज पराभूत केले.

मार्को जेन्सनच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिका सुस्थितीत

कोलकाता : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टी-२० उपांत्य फेरीतील महत्त्वाच्या

T20 World Cup 2026 : इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी खेळाडूंनी घेतला बाप्पाचा आशीर्वाद

मुंबई : टी२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील काही क्रिकेपटूंनी मुंबईतील

T20 World Cup : खेळाडूवर दुःखाचा डोंगर; रिंकू नंतर आणखी एका खेळाडूच्या वडिलांचे निधन

मुंबई : वर्ल्ड कपचा अंतिम सामना जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतशी प्रेक्षकांमध्ये सामन्याबद्दलची उत्सुकता वाढली

Smriti Mandhana : कौतुकास्पद! स्मृती मानधना पुन्हा ठरली आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल

आयसीसी क्रमवारीमध्ये भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना एकदिवसीय फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर