Friday, April 26, 2024
Homeताज्या घडामोडीVideo : उद्धव ठाकरे 'सामना'मधून काळापैसा 'व्हाइट' करतात

Video : उद्धव ठाकरे ‘सामना’मधून काळापैसा ‘व्हाइट’ करतात

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा गंभीर आरोप

मुंबई : इकडचे ‘खोके’ तिकडे ‘सामना’मध्ये दाखवून व्हाइट करण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले, असा खळबळजनक दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेली टीका भारतीय जनता पक्षाच्या जिव्हारी लागली असून आज उद्धव यांच्यावर नारायण राणे हल्लाबोल केला.

नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण केवळ शिव्याशाप देण्यासाठीच होते. लोक दस-याच्या दिवशी शुभ बोलतात, पण उद्धव यांनी केवळ शिव्याशाप देत शिमगा साजरा केला. उद्धव यांच्या भाषणात कुठेही वैचारिक पातळी नव्हती, अशी टीकाही राणे यांनी केली. राणे यांनी उद्धव यांच्यावर अनेक मुद्दावरून टीका केली.

कोरोनाचा उद्रेक झालेल्या २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षात संपूर्ण देशात उद्योगधंदे बंद पडलेले असताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ने ४२ कोटी रुपयांची उलाढाल केली आणि साडे अकरा कोटी रुपयांचा नफा कमावला. देशातील सर्व वृत्तपत्र संस्था डबघाईला निघाल्या आणि माध्यम समूहांना कोरोना काळात मोठा फटका बसला. पण सामनाने नफा कमावला, यामागचे गुपीत काय?, असा सवाल उपस्थित करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

कोरोना काळात ‘सामना’ने कमावलेले ४२ कोटी रुपये आले कुठून याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावे, असे राणे म्हणाले. राजमुद्रा प्रिटिंग प्रेसच्या गौरी भिडे नावाच्या महिला आहेत त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्धव ठाकरे यांचे उत्पन्नाचे स्त्रोत काय? याची विचारणा त्यांनी केली. सामनाचे उत्पन्न काय? आणि उद्धव ठाकरेंचे उत्पन्न काय? हे त्यांनी सांगावे. त्यानंतरच खोक्याचे आरोप करावे. कोरोनात सगळ्या कंपन्या देशोधडीला लागलेल्या असताना यांचे वृत्तपत्र नफ्यात होते. भुजबळ दोन-अडीच वर्ष जेलमध्ये राहिले. भुजबळांचा जो सीए आहे. त्याच सीएने ”मातोश्री”चेही पैसे व्हाइट केले. भुजबळांनी अडीच वर्ष आत काढली आता उर्वरित अडीच वर्ष उद्धव ठाकरेंना जेलमध्ये काढायची आहेत. आम्ही सोडणार नाही. तुम्ही लोकांचे पैसे बुडवले आहेत”, असा घणाघात नारायण राणे यांनी केला आहे.

“उद्धव ठाकरे नेमकं करतात काय? काहीही न करता ते संपत्तीचे मालक कसे झाले?”, असा सवाल उपस्थित करत नारायण राणे यांनी हल्लाबोल केला. तसेच उद्धव ठाकरेंनी कधी एकातरी शिवसैनिकाला मदत केली आहे का? एकनाथ शिंदे आणि या नारायण राणे यांनी शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवली. उद्धव ठाकरेंचे पक्ष वाढीसाठी नेमके योगदान काय? ते नुसते आयत्या बिळावर नागोबा आहेत, असे राणे म्हणाले.

“उद्धव ठाकरेंच्या प्रॉपर्टीबद्दल गौरी भिडे बोलल्याच आहेत. चतुर्वेदी नावाच्या सीएने भुजबळांप्रमाणेच ठाकरेंचेही ब्लॅकचे पैसे व्हाइट केले आहेत. यासंबंधीची सगळी कागदपत्रं दिल्लीला योग्य जागी पोहोचवली आहेत. त्यामुळे कुणाचीही सुटका होणार नाही. पाटणकरांची पण नाही आणि यांचीही सुटका नाही. दसऱ्याच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर फक्त तमाशा केला. साहेबांनी जगात नाव केलं. पण या माणसाची अजिबात पात्रता नाही”, असेही राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -