Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यमहिला आणि स्वातंत्र्य

महिला आणि स्वातंत्र्य

प्रियांका भोसले: मुंबई

आज आपण ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. आज सगळीकडे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. ब्रिटिश राजवटीतून भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि आपण गुलामगिरीतून मुक्त झालो. पण खरा प्रश्न हा आहे की, आपला देश तर स्वतंत्र झाला पण या देशातील प्रत्येक महिला स्वतंत्र झाली आहे का? तिला तिचं स्वातत्र्य मिळालं आहे का? ती तिचं स्वतंत्र आयुष्य जगत आहे का? तिला तिच्या विचारांचं स्वातंत्र्य मिळालं आहे का? हा प्रश्न प्रत्येक स्त्रीच्या मनात कधी ना कधी येतच असेल की, मी आणि माझं स्वातंत्र्य नक्की आहे तरी काय?

कधी मुलगी तर कधी पत्नी, कधी आई तर कधी ताई, तर कधी प्रेयसी, अशी सगळी रूपं एका स्त्रीमध्ये आपल्याला दिसतात. आयुष्यातले हे सगळे रोल निभावत असताना तिला तिचं स्वातंत्र्य दिलं जातंय का? तर हो, काही प्रमाणात, काही ठिकाणी महिलांना स्वातंत्र्य दिलं जात आहे. याच मिळणाऱ्या स्वातंत्र्यामुळे महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. ‘चूल आणि मूल’ ही संकल्पना बाजूला ठेवून चूल-मूल विथ करिअर ही संकल्पना चालू केली… मी, माझं घर, माझा संसार, माझी माणसं या चौकटीत न राहता, न अडकता मिळालेल्या स्वातंत्र्यातून एक गरुडझेप घ्यायला सुरुवात केली.

आता स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? त्याची व्याख्या काय? तर स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या स्वप्नांना, स्वतःच्या इच्छांना पंख देण्यासाठी, ती पूर्ण करण्यासाठी सक्षम असणं. तिच्या विचारांवर कोणतही बंधन न लादता, तिला आपल्या दबावाखाली न ठेवता, तिला तिच्या इच्छेप्रमाणे जगू देणं हेच खरं स्वातंत्र्य आहे.

रूपेरी पडद्यावर झळकणारी ग्लॅमर स्त्री असो, वा राजकारणातील प्रभावशाली स्त्री असो. लष्करी दलातील धाडसी स्त्री असो, वा कॉर्पोरेट क्षेत्रामधील बुद्धिमान स्त्री असो. या सगळ्याच क्षेत्रात महिलांनी आपल्याला जे जगण्याचं आणि विचारांचं स्वातंत्र्य मिळालं आहे, त्या स्वातंत्र्यामुळे आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. आजची स्त्री दुसऱ्यांचे विचार आपल्यावर न लादता, कोणत्याही बंधनात न अडकता आपली स्वप्नं पूर्ण करीत आहे. याचाच अर्थ असा आहे की, महिलांना स्वातंत्र्य दिलं जात आहे आणि ही बाब आपल्या समाजासाठी आणि आपल्या देशासाठी खूप चांगली आहे.

आज अनेक महिला सक्षम आहेत. हळूहळू का होईना सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. विशेषतः मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरात महिलांच्या स्थितीत, राहणीमानात, विचारात खूप बदल झालेला आहे. रात्री -अपरात्री आवश्यक कामासाठी घराबाहेर पडू लागल्या आहेत. वाटलं तर बुरखा घालेन आणि वाटलं तर बिकीनी घालेन, हे ठरवू शकतात. ‘मी, माय बॉडी, माय वे’ हे देखील अगदी बिनधास्तपणे बोलत आहेत. आपले विचार, मत बिनधास्तपणे मांडत आहेत. स्वतःच्या हक्कासाठी लढा देत आहेत. मात्र नाण्याची दुसरी बाजूदेखील आहे. आजही काही महिलांचं स्वातंत्र्य हिसकावून घेतलं जात आहे. त्यांना त्यांचं स्वतंत्र आयुष्य जगू न देता कुणाच्या तरी दडपणाखाली आयुष्य जगावं लागत आहे. मुलीने कोणते कपडे घालावेत, कसं बोलावं, काय करावं काय नाही या सगळ्या गोष्टी शिकवल्या जात आहेत. त्यावर बंधनं घातली जात आहेत. शिक्षणाचा अधिकार हिसकावून घेतला जात आहे. ग्रामीण भागात तर आजही एखाद्या महिलेला उंबरठ्याबाहेर पडताना कोणाची तरी परवानगी घ्यावी लागतेय. त्यामुळे आज आपण कितीही महिलांची प्रगती पाहत असलो, महिला स्वतंत्र, महिला सक्षमीकरण यावर जरी बोललो तरी आज अनेक महिला आपलं स्वतंत्र आयुष्य जगू शकत नाहीत, ही देखील तितकीच खरी गोष्ट आहे.

महिलांनी आणि मुलींनीदेखील आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग हा आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी करावा. कोणत्याही परिस्थितीत न जुमानता आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने आपल्या ध्येयापर्यंत पोहोचावं…घाबरणं वगैरे सोडून द्यावं आणि एखादी गोष्ट पटत नसेल तर ‘नो मिन्स नो’ बोलायला शिकावं. तुमच्या जगण्यावर आणि तुमच्या स्वातंत्र्यावर खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त तुमचाच अधिकार असायला पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -