मुंबई : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपिटीत सापडलेल्या शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही. एसटी कामगारांनी तडफडून आत्महत्या केल्या तरीही तुम्हाला पाझर फुटला नाही. पण स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालायला सरकारी तिजोरीचे कोट्यवधींचे नुकसान. ‘वा रे ठाकरे सरकार’ अशा शब्दांत भाजप पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचा ४ कोटी ३३ लाख लाखांचा दंड माफ केल्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे.
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही कबूल करूनही प्रोत्साहन भत्ता देत नाही. शेतकऱ्यांसाठी पैसे नसतात पण स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी कोट्यवधींची माफी करता. वा रे @OfficeofUT सरकार. 1/3
— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 13, 2022
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील पोखरण रोड क्र. १ येथे उभारलेल्या ‘छाबय्या विहंग गार्डन’ या गृहसंकुलातील अनधिकृत बांधकामासाठी ठाणे पालिकेने ठोठावलेला दंड व त्यावरील व्याज वित्त विभागाचा विरोध डावलून माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. या निर्णयावरुन भाजपाने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही ट्विटरवर व्हिडियो शेअर करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
“ठाणे येथील विहंग गार्डनचे अनधिकृत बांधकाम करणारे, ११४ सदनिका धारकांची फसवणूक करणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईकचे गुन्हे माफ करण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला असेल, परंतु महाराष्ट्राला लुटणाऱ्या ठाकरे सरकारला जनता कदापि माफ करणार नाही” असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.
"ठाणे येथील विहंग गार्डन चे अनधिकृत बांधकाम करणारे, ११४ सदनिका धारकांची फसवणूक करणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक चे गुन्हे माफ करण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला असेल, परंतु महाराष्ट्राला लुटणाऱ्या ठाकरे सरकारला जनता कदापि माफ करणार नाही"@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/4smeE4kJGX
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 12, 2022