नवी दिल्ली (हिं.स.) : केंद्र सरकारने अल्पकालीन सैन्यभरतीसाठी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शने सुरू आहेत. केंद्र सरकारने या योजनेची २३ वर्ष करूनही बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, तेलंगणा, हरियाणा आणि राजस्थानमध्ये शुक्रवारी हिंसक आंदोलने करण्यात आली. यावेळी काही ठिकाणी रेल्वेला आग लावण्याच्या घटना घडल्यात.
‘अग्निपथ’ योजनेंतर्गत चार वर्षांसाठी ‘अग्निवीरां’ची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने मंगळवारी केली होती. त्यानंतर बिहारमध्ये या योजनेच्या निषेधाचा सूर उमटला. त्याचे लोण उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, जम्मू, हिमाचल प्रदेश, झारखंड, राजस्थान, तेलंगणा आणि मध्यप्रदेशपर्यंत पोहोचले. उत्तर प्रदेशातील बलियामध्ये जमावाने ट्रेनला आग लावली. पोलिसांना पांगवण्याआधी आंदोलकांनी स्थानकावर उभ्या ट्रेनवर हल्ला करत तोडफोड केली. स्थानकावरील संपत्तीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले.
उत्तर प्रदेशातील पूर्व भागात रस्त्यावर हातात काठ्या घेऊन उतरलेल्या आंदोलकांनी पोलिसांसोबत वाद घातला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. बिहार आणि उत्तर प्रदेशातील अनेक ठिकाणी हे आंदोलन पेटत आहे. तर तेलंगणातील सिंकदराबाद येथे हिंसक आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्याचप्रमाणे हरियाणा आणि मध्य प्रदेशातही हे आंदोलनाचे लोण पसरले. यासोबतच आंदोलकांनी बिहारच्या पटना येथील दानापूर आणि आरा रेल्वे स्थानकावर एका रेल्वेइंजिनाला आग लावली. छप्रा, झाबुआ रेल्वे स्थानकांतही आंदोलकांनी मोडतोड केली. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडाव्या लागल्या.