घरांचे छप्पर उडाले, झाडे उन्मळून पडली, कडधान्ये, भाजीपाला व वीट भट्टीचे नुकसान
मुरबाड : मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागात मंगळवारी ३ वाजण्याच्या सुमारास जोरदार विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने दणका दिला. त्यामुळे भाजीपाला, कडधान्य तसेच वीटभट्टीचे नुकसान झाल्याने पुन्हा एकदा शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे.
तालुक्यातील कोरावळे गावात वादळ वाऱ्याचा जोरदार फटका बसला. संजय धुमाळ, काळूराम मोरे, बंदु राऊत यांच्यासह अनेक घरांच्या घरावरील छप्पर उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
रस्त्याच्या कडेला असणारे मोठे झाड उन्मळून पडल्याने जवळपास दोन तास वाहतूक बंद होती. ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावरील झाड बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरू झाली.
मागील तीन वेळा अवकाळी पावसाने झटका दिल्याने अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे. त्यात पुन्हा एकदा पावसाने मोठ्या प्रमाणात बरसात केल्याने ऐन मार्च, एप्रिलमध्ये पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी काय करावे हेच कळत नाही, अशा प्रकारच्या व्यथा शेतकरी वर्ग मांडत आहेत.