क्वालालंपूर (वृत्तसंस्था) : ‘टी-२०’ क्रिकेट म्हणजे धावांचा पाऊस आणि चौकार षटकारांची आतेबाजी असे चित्र असते. पण टी-२० मध्ये जर एखादा संघ फक्त ८ धावांवर ऑलआऊट झाला असे कोणी सांगितले, तर त्यावर कदाचित कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेद्वारे आयोजित एका स्पर्धेमध्ये असेच काहीसे घडले आहे.
आयसीसी १९ वर्षांखालील महिला ‘टी-२०’ वर्ल्डकप आशिया क्वालिफायरमध्ये अशी मॅच झाली ज्याचा कोणी विचार देखील केला नव्हता. युएई आणि नेपाळ यांच्यात शनिवारी ही मॅच झाली. या लढतीत नेपाळचा महिला संघ ८.१ षटकात फक्त ८ धावांमध्ये गारद झाला. उत्तरादाखल युएईने विजयाचे लक्ष्य १.१ म्हणजे फक्त ७ चेंडूत पार केले. एका दिवसापूर्वी नेपाळने कतारच्या संघावर ७९ धावांनी विजय मिळवला होता. या खास सामन्यात झाले असे की, नेपाळच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांची पहिली विकेट पडली.
त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये एका पाठोपाठ ३ गडी त्यांनी गमावले. त्यामुळे नेपाळची अवस्था २ बाद ४ अशी झाली. संपूर्ण डावात नेपाळच्या ६ खेळाडूंना भोपळाही फोडता आला नाही. स्नेहा माहारने सर्वाधिक ३ धावा केल्या. अन्य ३ फलंदाजांनी प्रत्येकी १ तर एका खेळाडूने २ धावा केल्या. युएईकडून महिका गौरने ४ षटकात २ धावा देत ५ विकेट घेतल्या, तर इंदुजाने ३ आणि समायराने १ विकेट मिळवली.
विजयासाठी असलेले फक्त ९ धावांचे लक्ष्य, युएईच्या संघाने केवळ ७ चेंडूत पार केले. कर्णधार तीर्था सतीशने ४, तर लावण्याने नाबाद ३ धावा केल्या. युएईचा पात्रता स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. याआधी त्यांनी ३ जून रोजी भूतानवर १६० धावांनी मोठा विजय मिळवला होता.