बेनॉनी: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगलेल्या अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी ठेवलेल्या २४५ धावांचे आव्हान भारताने २ विकेट आणि ७ बॉल राखत पूर्ण केले.
आफ्रिकेने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २४४ धावा केल्या होत्या. आफ्रिकेची सुरूवात काही आव्हानात्मक ठरली नाही.त्यांनी ५व्या षटकांत २३ धावांवर पहिला विकेट गमावला. आफ्रिकेला पहिला झटका स्टीव्ह स्टोल्कच्या रूपात बसला. त्याने १७ बॉलमध्ये २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १४ धावा केल्या. त्यानंतर ९व्या ओव्हरमध्ये संघाने दुसरा विकेट डेविड टीगरच्या रूपात गमावला.
लवकर विकेट गमावल्याने रिचर्ड सेलेट्सवेन आणि लुआन ड्रे प्रिटोरियस यांनी मोर्चा सांभाळला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. या भागीदारीला मुशीर खानने तोडले. प्रिटोरियस १०२ बॉलमध्ये ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७६ धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल भारताची सुरूवात धक्कादायक झाली. भारताने पहिले दोन सलामीवीर झटक्यात गमावले. आदर्श सिंग शून्यावर बाद झाला. तर अर्शीन कुलकर्णी १२ धावांवर बाद झाला. त्यानंतर मुशीर खानही ४ धावांवर बाद झाला. तीन विकेट झटपट गमावल्यानंतर उदय सहारणने ८१ धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तर सचिन धासने ९६ धावा केल्या. त्याने यावेळी ११ चौकार आणि १ षटकार ठोकले.
भारताला विजयासाठी दिलेले हे आव्हान दोन विकेट तसेच सात बॉल राखत पूर्ण केले. भारताचा आता फायनलमधील सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.