सामना आज संध्या. ५.३० ऐवजी दु. ३.३० वा.होणार सुरु
लंडन (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकून १-१ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे मँचेस्टरच्या मैदानात रविवारी होणारा तिसरा वनडे सामना हा अत्यंत महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना निर्णायक ठरणार असून जो हा सामना जिंकेल, त्याला मालिका जिंकता येणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ जीवाचे रान करतील हे निश्चित. ही बाब ध्यानी घेऊन आता भारतीय संघात दोन मोठे बदल केले जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
भारतीय संघाने आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये युवा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला संधी दिली होती. पण या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या लढतीत वेगवान गोलंदाजीचा पोषक वातावरण होते, पण तरीही त्याला छाप पाडता आली नव्हती. दुसऱ्या वनडेमध्ये प्रसिध हा भारताचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला होता. त्यामुळेच त्याला रोहित शर्माने पूर्ण १० षटकेही टाकायला दिली नाहीत. प्रसिधने ८ षटकांमध्ये ५३ धावा देत एक विकेट मिळवली होती. त्यामुळे आता तिसऱ्या वनडेमध्ये नक्कीच त्याला संघाबाहेर केले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रसिधच्या जागी युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप याला संघात स्थान मिळू शकते किंवा मोहम्मद सिराज यालाही यावेळी संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे तिसऱ्या वनडेसाठी हा पहिला बदल भारतीय संघात होऊ शकतो.
तर गेल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने रवींद्र जडेजाला संघात संधी दिली. पण या संधीचे सोने मात्र त्याला करता आलेले नाही. दुसऱ्या सामन्यात गोलंदाजी करताना जडेजाला एकही विकेट मिळवता आली नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात त्याला वगळण्यात येऊ शकते. जडेजाच्या जागी शार्दुल ठाकूर याला संधी मिळू शकते. इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाजीला पोषक वातावरण असते, त्याचबरोबर शार्दुल हा उपयुक्त फलंदाजीही करू शकतो. त्यामुळे जडेजाच्या जागी आता शार्दुलला स्थान मिळू शकते, अशी दाट शक्यता दिसत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना हा मँचेस्टरमध्ये होणार आहे. हा सामना संध्याकाळी ५.३० वाजता नव्हे तर दुपारी ३.३० वाजता सुरु होणार आहे.