मुंबईत दीड वर्षांत प्रथमच ‘झीरो’
मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मुंबईकरांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद रविवारी झालेली नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबईत २६ मार्च २०२० नंतर म्हणजेच गेल्या १८ महिन्यानंतर पहिल्यांदाच असे पाहायला मिळाले आहे.
मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये ३६७ नवे रुग्ण आढळून आले तर ४१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७ टक्क्यांवर पोहोचले आहे. यासोबतच पॉझिटिव्हीटी दर १.२७ टक्क्यांवर आला आहे. विशेष म्हणजे १० ते १६ ऑक्टोबरमधील पॉझिटिव्हीटी दर केवळ ०.०६ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. शहरात सध्या ५,०३० सक्रिय रुग्ण आहेत. एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतून काल केवळ एक कोरोना रुग्ण आढळून आला आहे.
राज्यात १७१५ नवे रुग्ण
राज्याची आकडेवारी पाहायची झाल्यास गेल्या २४ तासांत १७१५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर २६८० जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. मात्र, २९ जणांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या २८ हजार ६३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा ६५,९१,६९७ वर पोहोचला आहे. तर आजवर ६४,१९,६७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख ३९ हजार ७८९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कालच्या २९ रुग्णांचा आकडा पाहता. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. कालपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,१०,२०,४६३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,९१,६९७ (१०.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२०,४७४ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ९६५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.