Tuesday, May 21, 2024
Homeमहत्वाची बातमीटिळकांनी १२९ वर्षांपूर्वी सांगितलेली परिस्थिती आजही जैसे थे...

टिळकांनी १२९ वर्षांपूर्वी सांगितलेली परिस्थिती आजही जैसे थे…

वर्ष १८९३ मध्ये मुंबईत हिंदू आणि मुसलमान यांच्यात पहिली दंगल झाली. लोकमान्य टिळकांच्या लेखसंग्रहातील पहिला राजकीय खंड आपण वाचला तर त्यात या विषयावरचे अनेक लेख आढळतील. यातील प्रत्येक लेखांमध्ये त्यांनी अनेक उदाहरणे देऊन असे स्पष्ट केले आहे की सरकारी अधिकारी मुसलमानांची गय करतात त्यांना अप्रत्यक्षपणे फूस देतात.

गोरक्षणाच्या चळवळीने मुसलमान चिडून दंगलीला प्रवृत्त होतात यासारखे जे प्रवाद ब्रिटिश अंमलदार गंभीरपणे करीत होते त्याचा टिळकांनी घेतलेला खरमरीत समाचार निरंतर उपयोगी पडणारा आहे. लोकमान्य टिळकांचा त्या वेळचा विचार हा अत्यंत कठोर होता.

आज आपल्याला हेच चित्र दिसते. मुसलमानांच्या अत्याचारी प्रवृत्तीला पाठीशी घालणारे अनेक राजकीय नेते आहेत.

सौराष्ट्राच्या एका माजी संस्थानातील प्रभासपट्टण तीर्थाच्या गावी प्रथम हिंदू मुसलमानांचा दंगा झाला. तेथील हिंदूंना मदत करण्याच्या हेतूने मुंबईत एक सभा आयोजित करण्यात आली. त्यापूर्वी मुसलमान समाजाने अशीच एक सभा आपल्या धर्म बंधूंच्या सहाय्यार्थ भरवली होती. त्या सभेच्या विरोधात हिंदूंनी एक शब्दही उच्चारला नव्हता. मात्र हिंदूंच्या सभेने मुसलमान संतप्त झाले.

११ ऑगस्ट १८९३ या दिवशी हातात काठ्या नसलेले मुसलमान दुपारच्या प्रार्थनेसाठी जुमा मशिदीत गेले. प्रार्थना करुन बाहेर पडले ते हातात काठ्या घेऊन. त्यांनी हिंदूंना चोपण्यास आरंभ केला.

११ ऑगस्टपूर्वी १५ दिवस एकूणच वातावरण सौराष्ट्राच्या माजी संस्थानात झालेल्या दंग्याच्या बातमीने तंग होते. नेमक्या कोणत्या दिवशी दंगा माजेल याची हिंदूंना कल्पनासुद्धा नव्हती. ११ ऑगस्ट या दिवशी हिंदू सावध नव्हते त्यामुळे त्यांना मार खावा लागला. हिंदूंप्रमाणे पोलीस दलही गाफील होते. पहिल्या दिवशी मुसलमानांना आवरण्यात पोलिसांना यश आले नाही. पण या गुंडांना पोलिसांची भीती वाटेल अशी वागणूक संपूर्ण शहरात कुठेही आढळली नाही. दुसरा दिवस उजाडला पोलिसांवर अवलंबून न राहता हिंदूंनी कायदा हातात घेतला आणि मुसलमानांच्या दंडाला दंडा भिडवला. त्याबरोबर मुसलमानांचा पारा खाली आला.

दंगा संपूर्णपणे मिटवण्यापूर्वीच सरकारी अंमलदार दंग्याविषयी हिंदूंना न पटण्यासारखे विचार बेधडक लिहीत होते. गोरक्षणाची चळवळ हे दंग्याचे मूळ आहे. हिंदू मुसलमानांशी सहानुभूतीने वागत नाहीत. त्यांच्याबद्दल वेडेवाकडे खोटेनाटे लिहितात आणि बोलतात म्हणून मुसलमान बिथरतात. दंग्याचे पाप काँग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीच्या माथी मारले जायचे.

थोडक्यात पोलीस खाते हिंदूंना जमेल त्या रीतीने दूषण देत होते. हा सर्वच प्रकार खोडसाळपणाचा आहे हे दाखवण्याचे काम लोकमान्य टिळकांनी त्यांच्या लेखांतून केले.

हिंदू मुसलमान दंग्या संदर्भात सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया साधारणपणे खालील स्वरूपाच्या होत्या.

ज्यांना पुढारी समजतात ते दंग्याचे पुढारी नसतात. दंग्याला चिथावणी देणारी माणसे निराळीच असल्यामुळे निरूपद्रवी पुढाऱ्यांचा जाहीर शांतीपाठ हा दंगा शमवण्याचा खरा उपाय नाही. गोरक्षणाच्या प्रयत्नाने मुसलमान गोमासाच्या अभावी उपाशी मरू लागल्याचा कोठेही बोभाटा नाही. मग गोरक्षणाच्या चळवळीला नावे ठेवण्यात हशील काय? गोरक्षणाने एकट्या मुसलमानांनी भडकावे आणि गोमास खाणाऱ्या ख्रिस्ती लोकांनी स्वस्थ बसावे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.

हिंदू मुसलमान दंग्याबाबत लोकमान्य टिळकांचे विचार काय होते ते आपण त्यांच्याच शब्दांत जाणून घेऊया.

“मुसलमान लोकांची सर्वत्र अशी समजूत आहे की, सरकार आपल्याला घाबरते त्यामुळे किंवा हा दंगा झाला असतां सरकार सहसा हिंदूंची बाजू घेणार नाही…

सरकार अशा रीतीने एका धर्माच्या लोकांना वचकते अगर त्यांचा फाजील सन्मान ठेवते अशी कोणाची ही समजूत होणे प्रजेच्या स्वास्थ्यास अपायकारक आहे. हल्ली जो प्रकार होत आहे तो समंजस मनुष्याच्या सल्ल्याने अगर कानाडोळ्याने होतो असे मानण्यास बिलकुल आधार नाही. मुसलमान लोक जर शेफारले असले तर आमचे मत याचे मुख्य कारण सरकारची फूस हे होय. युरोपियन लोक हिंदू लोकांस नेहमी असे हिणवीत असतात की इंग्रजी राज्य आहे म्हणून हिंदू लोकांचे मुसलमानांपासून संरक्षण होत आहे…. जणू काय मुसलमान लोकांपासून आमचे संरक्षण करण्यासाठीच परमेश्वराने त्यांना पाठवले आहे! परंतु ही समजूत अत्यंत चुकीची आहे. इतकेच नव्हे तर असल्यासच मुसलमान लोकांना विनाकारण उत्तेजन मिळत गेले आहे. इंग्रज लोक हिंदुस्थान सोडून गेले असता आमचे काय होईल याची आम्हाला बिलकुल काळजी नाही. इंग्रजांनी हिंदुस्तानात पाऊल ठेवण्यापूर्वी मुसलमानांची सत्ता मोडत चालली होती, व इंग्लिशांनी हिंदुस्तानचे राज्य कमावले ते मुसलमानांपासून नव्हे तर मराठी आणि शिख लोकांपासून होय…. जुन्या गोष्टी सांगत बसण्यात काही हशील नाही. सध्या सरकारास आमचे इतकेच सुचवणे आहे की , मुसलमानांची नुसती प्रौढी गाऊन त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचा जो नेहमी उद्योग सुरू आहे तो आम्हासच काय पण एकंदर इंग्रजी राज्याला अपायकारक आहे… कित्येक सरकारी अंमलदार बऱ्याच वेळी ही गोष्ट विसरून जाऊन हिंदू-मुसलमानांतील द्वेषभाव कायम राहिला तरच इंग्रजी राज्याचे हित आहे. अशा समजुतीने मुसलमान लोकांना चिथवण्याचा हस्ते परहस्ते प्रयत्न करीत असतात.”

युरोपियन लोकांनी मुसलमानांना वाजवीपेक्षा जास्त स्वातंत्र्य दिले. आज त्याची फळे युरोपला भोगावी लागत आहेत. इंग्लंडमध्ये सुद्धा सध्या काय परिस्थिती आहे याची आपल्याला कल्पना आहेच. फ्रान्सला सुद्धा आपले कायदे कडक करावे लागले. अतिरेक्यांची बाजू घेणे त्यांना पाठीशी घालणे म्हणजे आत्मघात आहे. सध्या अफगाणिस्तानात काय वातावरण आहे ते सांगण्याची आवश्यकता नाही.

आततायी आणि अतिरेक्यांना फूस लावणे म्हणजे आत्मघात आहे. हे लोकमान्य टिळकांनी १२९ वर्षांपूर्वी सांगितले होते. त्या परिस्थितीत आणि आजच्या परिस्थितीत काहीही फरक नाही हेच आपल्या लक्षात येईल.

राष्ट्राचे हित साधणाऱ्या राष्ट्रभक्तांच्या पाठीशी उभे राहणे यातच सर्वांचे कल्याण आहे. शत्रूची, आततायींची आणि अतिरेक्यांची बाजू घेणा-यांनी याचा विचार करावा.

– दुर्गेश जयवंत परुळकर
व्याख्याते आणि लेखक
९८३३१०६८१२

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -