तहसीलदार, नायब तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी बेमुदत संपावर, २७ मार्चपासून लेखणी आणि ३ एप्रिलपासून बेमुदत कामकाज बंद!
मुंबई : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होऊन सात दिवस झाले. शासनाने आवाहन केले मात्र कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. या संपामुळे राज्यात अनेक ठिकाणी प्रशासकीय कामे खोळंबली आहेत. तर कुठे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यात आता तहसीलदार, नायब तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी बेमुदत संपावर जाणार असून २७ मार्चपासून लेखणी आणि ३ एप्रिलपासून बेमुदत कामकाज बंद करण्याचा इशारा दिला आहे. या काळात कायदा सुव्यवस्था आणि नैसर्गिक आपत्तीचे काम करणार असल्याचे महाराष्ट्र तहसीलदार संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील तहसीलदार, नायब तहसीलदार, उप जिल्हाधिकारी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून त्यांनी संपावर जात असल्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे नुकसान भरपाईच्या पंचनाम्याची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
- तहसीलदार, नायब तहसीलदार २७ मार्चपासून लेखणीबंद आंदोलनाच्या माध्यमातून सक्रिय सहभागी होणार.
- कायदा सुव्यवस्था आणि नैसर्गिक आपत्ती संदर्भातील कामे पार पडणार. हे दोन विषय वगळता इतर कोणतेही आंदोलन लेखणी आंदोलनादरम्यान पार पडणार नाही.
- मागणी मान्य न झाल्यास ३ जुलैपासून संघटनेचे नियोजित बेमुदत कामकाज बंद आंदोलन देखील सुरू राहणार.
राज्यभरातील वेगवेगळ्या विभागातील शासकीय कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी या आठवड्यात सरकारी कर्मचाऱ्यांकडून संप काळात आंदोलनाचे विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
२० मार्च : थाळी नाद
सर्व कर्मचारी आपापल्या कार्यालयासमोर, शाळेसमोर दुपारी १२ ते साडेबारा या वेळात गगनभेदी थाळी नाद करून राज्य सरकारच्या नकारात्मक भूमिकेचा धिक्कार करणार आहेत
२३ मार्च : काळा दिवस
या दिवशी जिल्हानिहाय कर्मचारी, शिक्षक काळे झेंडे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार आहे. घोषणांच्या निनादात निदर्शने करण्यात येणार आहे.
२४ मार्च : माझे कुटुंब माझी पेन्शन अभियान
या दिवशी जिल्हा निहाय कर्मचारी शिक्षक कुटुंबासहित जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन निषेध व्यक्त करणार आहेत.