मुंबई (प्रतिनिधी) : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग वाढीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या विरोधात भाजपने याचिका दाखल केली आहे. गुरुवारी याबाबत सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबतच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यास नकार दिला आहे. याबाबत राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.
राज्य सरकारकडून मुंबईतील ९ प्रभाग वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र भाजपने याला विरोध करत उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडून याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २१ डिसेंबरला होणार आहे.
दरम्यान मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यानुसार राज्य सरकारने लोकसंख्या वाढीमुळे प्रभाग वाढीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ झाली आहे.
तर कोविडच्या पार्श्वभूमीवर जनगणना न होता प्रभाग वाढ चुकीची असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर न्यायालयाने खुलासा मागितला असून आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे, निकाल योग्यच लागेल असे याचिकाकर्त्या भाजप नगरसेविक राजेश्री शिरवाडकर यांनी सांगितले.