विद्यार्थ्यांना भोगावा लागतोय नाहक त्रास
पुणे : आज महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये तलाठी भरती परीक्षा (Talathi Exam) पार पडते आहे. परंतु सकाळी पहिल्या सत्रापूर्वीच सर्व्हर डाऊन झाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला होता. छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, नागपूर, लातूर या जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्रांवर सर्व्हर डाऊन (Server down) होते. सकाळी ९ ते ११ ही परिक्षेची वेळ दिलेली असताना साधारण पावणेदहाच्या सुमारास सर्व्हर्स पूर्ववत झाले. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला असून आता पुढील दोन्ही सत्रांच्या परिक्षाही दीड तास उशिरा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व परीक्षा केंद्रांबाहेर तसे बोर्ड लावण्यात आले आहेत.
अगोदर दिलेल्या वेळेप्रमाणे तलाठी परिक्षेचे पहिले सत्र सकाळी ९ ते ११, दुसरे सत्र १२:३० ते २:३० तर तिसरे सत्र ४ ते ६ या वेळेत पार पडणार होते. मात्र सर्व्हर डाऊनच्या गोंधळामुळे आता प्रत्येक सत्र दीड तास पुढे ढकलण्यात आले आहे. यानुसार दुसरे सत्र दुपारी २ ते ४ या वेळेत होईल तर तिसरे सत्र ५:३० ते ७:३० या वेळेत होणार आहे. पहिल्या सत्रासाठी ज्या वेळेस प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु करण्यात आली त्यानुसार पुढील दोन तासांचा पूर्ण वेळ दिला जाणार आहे.
परीक्षा आता जरी व्यवस्थित सुरु असली तरी यात विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. काही विद्यार्थी केवळ परिक्षेकरता दुसर्या जिल्ह्यातून आले आहेत व त्यांनी परतीचे तिकीटही बुक केले आहे. आता तब्बल दीड तास उशीर होणार असल्याने या विद्यार्थ्यांच्या रेल्वे हमखास चुकणार आहेत. विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना त्यांना या सगळ्या प्रकाराला सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्यासोबत आलेले नातेवाईकही संतप्त झाले आहेत.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra