Friday, July 17, 2026

Eknath Shinde : मणिपूरमध्ये सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती उभारणार

Eknath Shinde : मणिपूरमध्ये सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती उभारणार

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह 'ईशान सेतू' उपक्रमात सहभागी

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या मुंबईच्या श्री सिद्धिविनायक मंदिराची (Siddhivinayak temple) भव्य प्रतिकृती लवकरच मणिपूरमध्ये (Manipur) उभारली जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित 'ईशान सेतू - सांस्कृतिक एकात्मता व राष्ट्रनिर्माण' सोहळ्यात ते बोलत होते. श्री सिद्धिविनायकाच्या कृपेने हे मंदिर महाराष्ट्र आणि ईशान्य भारत यांच्यातील धार्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक नात्याचा एक मजबूत 'ईशान सेतू' ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात शिंदे यांनी भारताच्या सांस्कृतिक ऐक्याचा आणि ईशान्य भारताशी आत्मीय नाते दृढ करण्याचा संदेश दिला. (Mumbai Sinddhivinayak)

या सोहळ्याला स्वामी गोविंददेव गिरी, स्वतंत्र देव सिंह, विविध राज्यांतील लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, सामाजिक-सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी आणि देशातील प्रमुख मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वामी गोविंददेव गिरी आणि अमित शाह यांच्या हस्ते रामायण, श्रीमद्भगवद्गीता, हनुमान चालीसा यांसारख्या महान ग्रंथांचे ईशान्य भारतातील स्थानिक भाषांमधील अनुवाद या वेळी प्रकाशित करण्यात आले. ईशान्य भारतातील नागरिकांपर्यंत या पवित्र ग्रंथांचे मोफत वितरण करण्याचा संपूर्ण खर्च उचलण्याची मोठी जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या स्वीकारली असून, भारतीय संस्कृतीचा वारसा घराघरांत पोहोचविण्याच्या या अभियानात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. ईशान्य भारतातील समृद्ध साहित्याचे हिंदी आणि मराठी भाषेतही भाषांतर व्हावे, अशी विनंती त्यांनी 'ईशान सेतू ट्रस्ट'ला केली असून या साहित्यिक देवाणघेवाणीला महाराष्ट्र सरकारतर्फे पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. (Eshan Setu)

अमित शाह यांच्या नेतृत्वाचा गौरव

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांच्या कार्याचा गौरव करताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, त्यांच्या सक्षम नेतृत्वामुळे देशाची अंतर्गत सुरक्षा अधिक मजबूत झाली असून नक्षलवादावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. ईशान्य भारतातील अनेक दशकांचा संघर्ष आणि तणाव कमी झाला असून विविध सशस्त्र संघटनांशी शांतता करार झाले आहेत. सुमारे १० हजार ८०० हून अधिक युवकांनी हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला असून, नागरिकांच्या मृत्यूंमध्ये ८६ टक्क्यांनी घट झाली आहे. ईशान्य भारताला देशाच्या इतर भागांशी आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या जोडण्याचे अमित शाह यांचे मिशन देशासाठी मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा