Tuesday, July 14, 2026

Nashik : नाशिकच्या कांदा बाजारात रोकड टंचाईचे संकट; शेतकऱ्यांच्या देयकांना विलंब

Nashik : नाशिकच्या कांदा बाजारात रोकड टंचाईचे संकट; शेतकऱ्यांच्या देयकांना विलंब

Nashik : नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारात (Onion Market) सध्या रोकड टंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले असल्याचे चित्र आहे आणि याचाच थेट फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion-growing farmers) बसत आहे. बँकांकडून व्यापाऱ्यांना आवश्यक तेवढी रोख रक्कम वेळेत उपलब्ध होत नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील (Agricultural Produce Market Committees) व्यवहारांवर आता याचा परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी विकलेल्या कांद्याचे पैसे नियमानुसार २४ तासांच्या आत मिळण्याऐवजी अनेक तासांचा, तर काही ठिकाणी त्याहून अधिक विलंब होत असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने (State Onion Growers' Association) केली आहे.

रोकड उपलब्ध होत नसल्याने व्यवहारांची गती मंदावली

देवळा तालुक्यात सध्या कांद्याला समाधानकारकी असा बाजारभाव मिळत आहे. देवळा तालुक्यात दोन खासगी आणि दोन शासकीय अशा एकूण चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये रोजच मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात मात्र, व्यापाऱ्यांना बँकांकडून वेळेवर रोकड उपलब्ध होत नसल्याने व्यवहारांची गती मंदावली आहे ज्याचा थेट शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांवर बसत आहे. परिणामी शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष भारत दिघोळे (Bharat Dighole) यांच्या मार्गदर्शनाखाली देवळ्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची भेट घेत निवेदन सादर केले. व्यापाऱ्यांना आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करून देण्यात यावा आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमानुसार २४ तासांच्या आत मिळावेत, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

...अन लिलावातील स्पर्धा कमी

संघटनेच्या म्हणण्यानुसार, जर कांडा बाजारात सकाळी सुमारे १० वाजता लिलाव झाला तरी त्याचे पैसे अनेकदा संध्याकाळपर्यंत देखील मिळत नाहीत. काही व्यापाऱ्यांकडे आवश्यक रोख उपलब्ध नसल्यामुळे ते लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचेही टाळतात. त्यामुळे लिलावातील स्पर्धा कमी होत असून त्याचा परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होत आहे. या परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल सुमारे १०० ते २०० रुपयांपर्यंत आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. विशेषतः खासगी बाजार समित्यांमध्ये ही समस्या अधिक तीव्र असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संघटनेने प्रशासनाकडे संबंधित बँकांच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन व्यापाऱ्यांना आवश्यक निधी आणि रोख रक्कम वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. संघटनेचे नाशिक जिल्हा समन्वयक भगवान जाधव यांनी, मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कांद्याची विक्री झाल्यानंतरही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगितले.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे यांनी शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे २४ तासांच्या आत मिळणे हा त्यांचा कायदेशीर अधिकार असल्याचे स्पष्ट करत प्रशासनाने या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली. व्यापाऱ्यांना वेळेत रोकड उपलब्ध झाल्यास अधिक व्यापारी लिलावात सहभागी होतील, स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्याला अधिक चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >