Monday, July 13, 2026

Nashik TCS Case : संशयितांना जामीन मंजूर पण.... कोर्टाने संशयितांना कोणत्या अटी घातल्या ?

Nashik TCS Case : संशयितांना जामीन मंजूर पण.... कोर्टाने संशयितांना कोणत्या अटी घातल्या ?

Nashik TCS Case : नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नाशिकच्या टीसीएस प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कंपनीतील धार्मिक छळ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिन्ही संशयितांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, जामीनासोबतच खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयाने महत्त्वाची आणि कडक अट घालत संशयितांना थेट नाशिक शहरात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

टीसीएस कंपनीत सहकाऱ्याचा कथित धार्मिक छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले रझा रफिक मेमन (Raza Rafiq Memon) , तौसिफ बिलाल अत्तार (Tausif Bilal Attar) आणि शाहरुख हुसेन शौकत कुरेशी (Shahrukh Hussain Shaukat Qureshi) या तिन्ही संशयितांना न्यायालयाने प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मात्र, तपास पूर्ण झाल्यानंतर जामीन देताना न्यायालयाने संशयितांवर कठोर निर्बंध लादले आहेत. त्यानुसार, या तिन्ही संशयितांना नाशिक शहरात राहण्यास तसेच शहरात मुक्तपणे प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे जामीन मिळाला असला तरी संशयितांना शहराबाहेरच राहावे लागणार आहे. (Nashik TCS Case)

विशेष अटींसह जामीन मंजूर

अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमित खारकर (Amit Kharkar) यांनी दिलेल्या या आदेशाची कायदेवर्तुळात आणि शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात मुंबई नाका पोलिसांनी (Mumbai Naka Police) वेळेत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकारी पक्षानेही संशयितांच्या जामिनाला विरोध करत गुन्ह्याचे गांभीर्य आणि साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर न्यायालयाने कायदा-सुव्यवस्था, पीडित आणि साक्षीदारांच्या सुरक्षेचा विचार करून या विशेष अटींसह जामीन मंजूर केला. (Nashik TCS Case)

कोर्टाने घातलेल्या प्रमुख अटी काय ?

संशयितांना नाशिक शहराची हद्द सोडावी लागणार

नाशिक शहरात राहता किंवा मुक्तपणे वावरता येणार नाही

दर सोमवारी आणि शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत मुंबई नाका पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार

न्यायालयीन तारखेला हजर राहण्यासाठी शहरात येण्याची परवानगी असेल

मात्र, न्यायालयीन कामकाज किंवा पोलीस ठाण्यातील हजेरी पूर्ण होताच तात्काळ नाशिक शहराबाहेर जावे लागणार

न्यायालयाच्या या निर्णयामुळे पीडित कुटुंब आणि साक्षीदारांना मोठा दिलासा मिळाला असून, जामीन देतानाही कठोर अटी लावण्याचा हा निर्णय कायदेवर्तुळात महत्त्वाचा मानला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा