Saturday, July 11, 2026

Nashik : कुंभमेळ्याच्या तोंडावर मोठी कारवाई! पाच साधू-महंत आखाड्यातून आजीवन हद्दपार; त्र्यंबकेश्वरच्या महंत रघुमुनींचाही समावेश

Nashik : कुंभमेळ्याच्या तोंडावर मोठी कारवाई! पाच साधू-महंत आखाड्यातून आजीवन हद्दपार; त्र्यंबकेश्वरच्या महंत रघुमुनींचाही समावेश

Nashik : नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) तयारीला वेग आला असतानाच धार्मिक वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आखाड्यांमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहे. श्री पंचायत बडा उदासीन आखाड्याने पाच साधू-महंतांना आजीवन हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनासह आखाडा परिषदेतील राजकारणाचीही चर्चा रंगू लागली आहे.

नेमकं काय घडलं ?

तमिळनाडूतील कांचीपुरम येथे श्री पंचायत आखाडा बडा उदासी निर्वाण यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील संत-महंत उपस्थित होते. आखाड्याशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर संस्थेच्या परंपरा, शिस्त आणि प्रतिष्ठेला बाधा आणल्याचा आरोप असलेल्या पाच साधू-महंतांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या निर्णयानुसार संबंधित पाचही साधूंना आजीवन हद्दपार करण्यात आले असून, त्यांच्याशी सर्व धार्मिक आणि संघटनात्मक संबंध तोडण्याचा म्हणजेच पारंपरिक भाषेत 'हुक्का-पाणी बंद' करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

कोणावर झाली कारवाई ?

या कारवाईत त्र्यंबकेश्वरचे श्रीमहंत रघुमुनी, महंत उग्रदास, जयेंद्र मुनी (कनखल), स्वामी शिवानंद (प्रयागराज) आणि सेवादास (हरिद्वार) यांचा समावेश आहे. संबंधितांनी आखाडा आणि श्री सतपंच परमेश्वर यांच्या हिताविरोधात न्यायालयासह इतर मंचांवर भूमिका घेतल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे वर्तनही आखाड्याच्या परंपरा आणि शिस्तीविरोधात असल्याचे नमूद करण्यात आले. आखाड्याचे श्री महंत दुर्गादास महाराज यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, संस्थेची परंपरा, शिस्त आणि प्रतिष्ठा जपणे हे सर्वोच्च प्राधान्य आहे. भविष्यातही आखाड्याच्या हिताविरोधात कोणतीही कृती करणाऱ्यांविरोधात नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल.

या निर्णयामुळे सर्वाधिक चर्चा महंत रघुमुनी यांच्या नावाची होत आहे. काही दिवसांपूर्वीच त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या कार्यक्रमात आखाडा परिषदेच्या दुसऱ्या गटाने त्यांना बडा उदासीन आखाड्याचे प्रतिनिधी म्हणून घोषित केले होते. त्या कार्यक्रमात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्रपुरी महाराज आणि महामंत्री महंत हरीगिरी महाराज यांनी व्यासपीठावर रघुमुनी यांना स्थान देत आगामी नाशिक कुंभमेळ्यात त्यांच्या सहकार्याने बडा उदासीन आखाडा सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते.

आखाड्यांतील अंतर्गत मतभेद बाहेर

दरम्यान, आगामी सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना अशा प्रकारचा वाद समोर आल्याने धार्मिक क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. प्रशासन एका बाजूला कुंभमेळ्याच्या तयारीत व्यस्त असताना, दुसरीकडे आखाड्यांतील अंतर्गत मतभेद उफाळून आल्याने या घडामोडींकडे संत, भाविक आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे. आगामी काळात या वादावर कोणती भूमिका घेतली जाते आणि त्याचा कुंभमेळ्याच्या आयोजनावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >