- भाजप आमदार राम कदमांचा विधानसभेत दावा; तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश
मुंबई : "ज्या आईने मला जन्म दिला, तिचे नुकतेच १२ जून रोजी निधन झाले. तिला तिच्या आयुष्याची शेवटची दोन वर्षे मरणासन्न यातना भोगाव्या लागल्या. माझ्या आईला फुफ्फुसाचा 'आयएलडी' (इन्टरस्टिशियल लंग डिसीज) हा आजार झाला होता, ज्याला जगात औषध नाही. हा अत्यंत वेदनादायी आजार कबुतरांच्या विष्ठेतून पसरणाऱ्या विषाणूंमुळे बळावतो. माझ्या आईच्या बाबतीत जे घडले, ते यापुढे इतर कुणाच्याही आईसोबत घडू नये, म्हणूनच मी हा विषय मांडत आहे," असे भाजपचे घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. कबुतरांमुळे मुंबईकरांच्या आरोग्याला निर्माण झालेल्या या गंभीर धोक्याकडे लक्ष वेधताना, मुंबईतील कोट्यवधी जनतेला या जीवघेण्या आजारापासून वाचवण्यासाठी शहरातील कबुतरांचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. (Ram Kadam)
मुंबईतील दादर येथील कबुतरखान्याचा प्रश्न काही महिन्यांपूर्वी वादात अडकला होता. कबुतरांमुळे आरोग्याला धोका निर्माण होतो, असा दावा करत तो बंद करण्यात आल्यामुळे जैन धर्मीयांनी याविरोधात तीव्र आंदोलन पुकारले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्यांतर्गत राम कदम यांनी आपल्या दिवंगत आईच्या आजारपणाचा दाखला देत हा विषय मांडला. ते म्हणाले की, त्यांच्या आईने आयुष्यभर नामस्मरण केले, मात्र शेवटच्या काळात तिला २४ तास ऑक्सिजनवर राहावे लागले. फुफ्फुसांमधील फायब्रोसिस वाढू नये म्हणून केवळ जुजबी औषधे मिळत होती. आई पंधरा-पंधरा मिनिटे न थांबता खोकायची आणि खोकता खोकता बेशुद्ध पडायची, अशा असहाय्य वेदना तिने सहन केल्या. भारतात दरवर्षी तब्बल नऊ लाख रुग्ण या आजाराला बळी पडत असल्याची माहितीही त्यांनी दिली. (Ram Kadam)
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील महत्त्वाचे बदल; नूतनीकरणाच्या दुहेरी शुल्कातून व्यापार-उद्योगांना कायमची मुक्ती मुंबई(Mumbai) : राज्यातील वाणिज्यिक ...
कदम म्हणाले, कबुतरांना दाणे देणे रातोरात बंद करावे असे मला अजिबात म्हणायचे नाही, कारण दादरचा कबुतरखाना बंद केल्यामुळे तिथे अनेक कबुतरांचे जीव गेले होते आणि कबुतरांनाही जगण्याचा अधिकार आहे. परदेशात कबुतरांचे स्थलांतर आणि त्यांच्या जन्मावर नियंत्रण (बर्थ कंट्रोल) असे उपाय योजले जातात. मुंबईतील राष्ट्रीय उद्यानात ५० हजार एकरची विस्तीर्ण जागा उपलब्ध असल्याने तिथे आपण या कबुतरांचे सुरक्षित स्थलांतर करू शकतो, असा उपाय त्यांनी सुचवला. राम कदम यांनी ही मागणी मांडल्यानंतर या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य शासनाला यावर विचार करण्याचे निर्देश दिले. कबूतरांद्वारे पसरणाऱ्या फुफ्फुसांच्या व्याधींविषयी सखोल अभ्यास करून योग्य ती उपाययोजना काढण्यासाठी तज्ज्ञांची एक विशेष समिती स्थापन करावी आणि त्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश अध्यक्षांनी सरकारला दिले. (Ram Kadam)
न्यायालयाच्या निर्णयानुसारच पुढील कारवाई - मंत्री दादाजी भुसे मुंबई(Mumbai) : राज्यातील शालेय शिक्षण विभागांतर्गत केंद्रप्रमुख पदाच्या भरती व पदोन्नती ...
राम कदम खोटे बोलतात - जैन मुनी :
दरम्यान, राम कदम यांनी विधानसभेत केलेल्या या दाव्यावर जैन मुनींनी तीव्र आक्षेप घेतला असून यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. जैन धर्मगुरू निलेशचंद्र मुनी यांनी माध्यमांशी बोलताना राम कदम यांचे दावे फेटाळून लावत त्यांना आव्हान दिले. "राम कदम हे खोटे बोलत आहेत. राम कदमांच्या आईचे निधन कबुतरांमुळेच झाले असेल, तर त्यांनी आधी त्याचे ठोस पुरावे द्यावेत. राम कदम यांच्या आईच्याच नाही तर जगातल्या प्रत्येकाच्या आईचा मुद्दा महत्त्वाचा असतो; त्यांनी आपल्या आईच्या मृत्यूचा असा विषय विधानसभेत मांडायला नको होता," असेही त्यांनी सांगितले. (Ram Kadam)
View this post on Instagram





