Wednesday, July 1, 2026

Uday Samant : 'ऑपरेशन वरळी' हा 'ऑपरेशन टायगर'चाच भाग

Uday Samant : 'ऑपरेशन वरळी' हा 'ऑपरेशन टायगर'चाच भाग

मंत्री उदय सामंत; सुनील शिंदे शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागतच करू

मुंबई : "सचिन अहिर यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा शिवसेना पक्षातील प्रवेश हा काहींना चेहऱ्यावर दाखवता येत नसला तरी आतून मोठा धक्का देणारा ठरला आहे. शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या 'ऑपरेशन टायगर'चाच एक भाग म्हणजे 'ऑपरेशन वरळी' आहे," असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी केला. त्याचप्रमाणे आमदार सुनील शिंदे यांनी सध्या त्यांची भूमिका स्पष्ट केली असली, तरी भविष्यात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त केली, तर त्यांचे पक्षात स्वागतच केले जाईल," असेही त्यांनी सांगितले. (MLA Sachin Ahir)

उबाठा गटाचे आमदार सुनील शिंदे (MLA Sunil Shinde) यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना उदय सामंत म्हणाले, सुनील शिंदे हे अत्यंत सक्षम नेतृत्व आहे. ते मूळचे धनुष्यबाण या चिन्हावरच निवडून आलेले आहेत. जर त्यांना त्यांच्या मतदारसंघाचा रखडलेला विकास वेगाने करण्यासाठी आमच्यासोबत यायचे असेल, तर आम्ही त्यांना का नाकारू? पक्षप्रवेशाची ही प्रक्रिया आता रोजचीच झाली असून, कालही अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. सचिन अहिर यांच्या बाजूला जाण्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला मोठा तडा गेल्याचे सांगत सामंत म्हणाले, माजी मंत्री आणि तीन वेळा आमदार राहिलेला नेता जर अचानक दुसरीकडे जात असेल, तर त्यामागे नक्कीच काहीतरी गंभीर कारण असणार, हे आता महाराष्ट्रातील जनतेलाही कळून चुकले आहे.

अधिवेशनात विकासाचे प्रश्न बाजूला ठेवून फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याच्या विरोधकांच्या टीकेला सामंत यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, "सभागृहात आम्ही जनतेच्या आणि विकासाच्या प्रश्नांवरही तितक्याच गांभीर्याने काम करत आहोत. मुंबईतील नालेसफाई, शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे प्रश्न, मराठी भाषेचा मुद्दा तसेच उद्योग विभागाच्या महत्त्वाच्या विषयांवर दररोज चर्चा होत आहे. प्रश्नोत्तराचा तास आणि लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत."

श्रीकांत शिंदेंच्या पदवीवरील आरोपांना प्रत्युत्तर

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वैद्यकीय पदवीबाबत विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांचा उदय सामंत यांनी समाचार घेतला. "हा विषय तीन वर्षांपूर्वीही काही लोकांनी राजकीय हेतूने उपस्थित केला होता, मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. श्रीकांत शिंदे हे स्वतः एक मान्यताप्राप्त ऑर्थोपेडिक सर्जन (अस्थिरोग तज्ज्ञ) आहेत. त्यामुळे त्यांच्या पदवीवर आक्षेप घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांनी पहिली निवडणूक एकनाथ शिंदे यांचे पुत्र म्हणून लढवली असेल, पण आज त्यांनी स्वतःचे स्वतंत्र आणि कर्तबगार नेतृत्व निर्माण केले आहे," असे सामंत यांनी स्पष्ट केले. (MLA Sachin Ahir)

केंद्रात शिवसेनेला किती मंत्रीपदे?

केंद्रातील आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला किती जागा मिळणार का, यावरही सामंत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, "याबाबतचा अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात होणाऱ्या चर्चेनंतरच होईल. केंद्रात शिवसेनेच्या दोन खासदारांना नवीन मंत्रिपदे मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अचूक संख्या आम्हाला ठाऊक नसली, तरी शिवसेनेला केंद्रात अधिक प्रतिनिधित्व मिळाले तर आम्हाला निश्चितच आनंद होईल," असे ते म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा