Friday, June 26, 2026

Nashik : नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी ! बाजारातभावात मोठा बदल

Nashik : नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी ! बाजारातभावात मोठा बदल

Nashik : नाशिकचा कांदा उत्पादक शेतकरी कांद्याला मिळणाऱ्या बाजारभावामुळे चिंतेत आहे. दरम्यान आता नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जवळपास सात महिन्यांनंतर कांद्याचा सरासरी भाव हा दोन हजार रुपयांवर गेला आहे.

दोन हजार रुपयांचा टप्पा ओलांडला

लासलगाव बाजार समितीत (Lasalgaon Market Committee) प्रति क्विंटल सरासरी २१५१ रुपये भाव मिळाला. या हंगामात कांदा दराने दोन हजार रुपयांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ. गुरूवारी लासलगाव बाजार समितीत (Lasalgaon Market Committee) १९ हजार ५०६ क्विंटलची आवक झाली. त्यास किमान ७००, कमाल २५५५ तर सरासरी २१५१ रुपये भाव मिळाला. त्यापूर्वी डिसेंबर २०२५ मध्ये लाल कांद्याला सरासरी २२८४ रुपये भाव मिळाला होता. मनमाड बाजार समितीत (Manmad Market Committee ) ३४६ ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली. त्यास सरासरी २,१७५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. डिसेंबर २०२५ नंतर पहिल्यांदाच कांदा दरात वाढ झाली.

शेतकऱ्यांची नाफेड आणि एनसीसीएफकडे पाठ

केंद्र सरकारने दर स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत नाफेड (NAFED) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाला (NCCF) थेट बाजार समितीत केंद्र स्थापन करून खरेदीला परवानगी दिली. सरकारी कांदा खरेदीचा दर वाढवून तो क्विंटलला १७३० रुपयांवर नेण्यात आला. तरीदेखील शेतकरी सरकारला कांदा देण्यास तयार नाहीत. कारण, ही प्रक्रिया किचकट असून त्यांच्याकडून केवळ चांगल्या दर्जाचा माल खरेदी केला जातो. मालाची प्रतवारी, वर्गीकरण केले जाते. सोबतच सरकारी खरेदीचे दर ३०० ते ४०० रुपयांनी कमी असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाच्या (NCCF) केंद्रांकडे पाठ फिरवली आहे.

भाव किती वाढणार ?

कांद्याला मिळणार भाव कमी असल्यामुळे अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवला आहे. ज्यांना पैश्यांची गरज आहे किंवा ज्यांचा कांदा खराब होण्याच्या मार्गावर आहे तेच शेतकरी बाजारात माल विक्रीसाठी आणतात. काही भागात पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकरी अन्य पिकांच्या पेरणीसाठी कराव्या लागणाऱ्या तयारीत व्यस्त आहेत. त्यामुळे कांद्याची आवक घटल्याने दर उंचावत आहेत. सरकारी खरेदीचे दर वाढले असले तरी आजही बाजारातील दरापेक्षा ते खूपच कमी आहेत. त्यामुळे नाफेड व एनसीसीएच्या खरेदीला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. पुढील काळात कांद्याचे दर सरासरी तीन हजार ते साडेतीन हजार रुपयांपर्यत जाऊ शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >