Monday, June 8, 2026

Goregaon-Mulund Link Road (GMLR) : दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान उड्डाणपूल १५ जुलैपर्यंत होणार खुले?

Goregaon-Mulund Link Road (GMLR) : दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान उड्डाणपूल १५ जुलैपर्यंत होणार खुले?

मुंबई : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात येत असून हे काम जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करून १५ जुलैपर्यंत या पुलाचे लोकार्पण करून वाहतुकीसाठी सुरु केले जाणार आहे. त्यामुळे गोरेगावकरांना आणखी एका पुलाची भेट पुढील महिन्यात मिळणार आहे. शनिवारी ६ जुन रोजी गोरेगाव पूर्व पश्चिम जोडणाऱ्या मृणालताई गोरे विस्तारीत पुलाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर आता जोड रस्ता प्रकल्पातील गोरेगावमधील पुलाचेही लोकार्पण होणार आहे.

गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) (GMLR) प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे. टप्पा ३ (अ) मध्ये उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोटरी बांधकामाचा समावेश आहे. या प्रकल्प अंतर्गत दिंडोशी - गोरेगाव - दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान १.२६ किलोमीटर लांबीच्‍या उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. दिंडोशी न्‍यायालयापासून उड्डाणपुलास सुरुवात होते. रत्‍नागिरी जंक्‍शन हॉटेल येथे ९० अंश कोनात उड्डाणपूल वळतो. तर, दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उतरतो. पुलाचे एकूण ३१ खांब असून, ३१ खांबांची उभारणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. तसेच, एकूण ३० पैकी बहुतांशी स्पॅनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. खांबांवर तुळई स्‍थापित करणे, डेक स्‍लॅब ओतकाम, पोहोच मार्ग आदी कामांसाठी वेळापत्रक निश्चित करण्‍यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याच्या उद्देशाने आवश्यक तेवढे मनुष्यबळ व इतर यंत्रणा यांची अधिक कुमक उपलब्‍ध करून देण्‍याबाबत संबंधितांना निर्देश वेळोवेळी देण्‍यात आले होते. हे काम ३१ मे २०२६ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्‍याचे महानगरपालिकेचे उद्दिष्‍ट होते. परंतु, कंत्राटदाराने ठरविलेल्या वेळापत्रकाचे पालन न केल्याचे प्रत्यक्ष पाहणी दरम्यान स्पष्ट झाले. त्यामुळे या जोड रस्त्यावरील पुलाचे लोकार्पण जून महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित मानले जात असले तरी आता याचे काम जुलै महिन्यात पूर्ण करून १५ जुलैपर्यंत याचे लोकार्पण केले जाण्याची शक्यता आहे.

या पुलाच्या बांधकामामध्ये कंत्राटदारांकडून कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या जात नसल्याने स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे स्थानिक नगरसेविका प्रिती सातम यांनी स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत वारंवार मुद्दा उपस्थित करून विकासकामे करताना स्थानिकांची गैरसोय होणार याची काळजी कंत्राटदार आणि पर्यायाने महापालिका प्रशासनाने घेणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. परंतु जोड रस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगावमधील या पुलाच्या बांधकामामध्ये महापालिका अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीचे अधिकारी कोणत्याही प्रकारची नागरिकांना त्रास होणार नाही या दृष्टीकोनातून कामे करत नसल्याबाबत तीव्र शब्दांत नाराजीही व्यक्त केली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा