Friday, June 5, 2026

Mantri Nitesh Rane : 'देवभाऊ'च कोकणच्या चित्रपटाचे डायरेक्टर!

Mantri Nitesh Rane : 'देवभाऊ'च कोकणच्या चित्रपटाचे डायरेक्टर!

मंत्री नितेश राणे; 'त्यांनी दिलेल्या जबाबदारीची मी केवळ अंमलबजावणी केली'

मुंबई : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत उबाठा गटाचे उमेदवार बाळ माने यांनी घेतलेल्या माघारीनंतर कोकणची जागा महायुतीने बिनविरोध राखली. या संपूर्ण राजकीय घडामोडींवर आणि पडद्यामागील रणनीतीवर मंत्री नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्त्वपूर्ण विधान केले आहे. "कोकणच्या या राजकीय चित्रपटाचे खरे डायरेक्टर 'देवभाऊ' म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत. त्यांच्या अचूक रणनीतीमुळेच महायुतीला हे यश मिळाले असून, पक्षनेतृत्वाने माझ्यावर दिलेली जबाबदारी मी केवळ एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून चोखपणे पार पाडली आहे," असे नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

बाळ माने यांच्या माघारीमुळे महाविकास आघाडीला (मविआ) कोकणात मोठा धक्का बसला असून, या विजयाचे सर्व श्रेय नितेश राणे यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना दिले आहे. "या प्रक्रियेत माझे वैयक्तिक असे फार योगदान नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात वरिष्ठ पातळीवर या जागेसंदर्भात निर्णय झाला होता. महायुतीचा आणि देवेंद्रजींचा प्रतिनिधी म्हणून मी तिथे फक्त पुढाकार घेतला. वरिष्ठ नेत्यांनी चित्रपटाची जी आखणी करून दिली होती, कोणी कुठे जावे आणि काय करावे हे आधीच ठरवले होते, आम्ही फक्त त्याची मैदानावर अंमलबजावणी केली," असे राणे म्हणाले.

उबाठा गटाकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर निशाणा साधला. "कोकण विधानपरिषद निवडणुकीत उबाठा गटाकडे अवघी ५५ मते होती. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतः उभा केलेल्या उमेदवाराला तुमच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्यावर जास्त विश्वास वाटतो, यात चूक कोणाची? बाळ माने यांना तुमच्या नेतृत्वावर विश्वास राहिला नाही, हे तुमचेच मोठे अपयश आहे," असा घणाघात त्यांनी केला. महायुतीचे वरिष्ठ नेते राज्यातील सर्व १७ जागांवर स्वतः पोहोचू शकत नसल्याने वेगवेगळ्या नेत्यांवर जबाबदारी दिली आहे. नाशिकमध्ये उदय सामंत आणि दादा भुसे काम पाहत आहेत, तर काही भागांत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय राऊतांनी आधी पुरावे द्यावेत

उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या १५० कोटींच्या घोडेबाजाराच्या आरोपाचा नितेश राणे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. "संजय राऊत यांनी जे काही आरोप केले आहेत, त्याचे आधी त्यांनी पुरावे द्यावेत. या निवडणुकीत त्यांच्या हाती काहीच लागले नाही, म्हणून त्यांना हे दुःख होत आहे का? काही महिन्यांपूर्वी भांडुपमध्ये गांजाची शेती आढळल्याचे मी ऐकले होते. त्यामुळे संजय राऊत यांनी आपल्या तब्येतीची आणि मानसिक आरोग्याची विशेष काळजी घ्यावी," असा टोला त्यांनी लगावला. विरोधी उमेदवाराने स्वतःहून अर्ज मागे घेतला कारण त्यांचा आपल्या पक्षावर विश्वास उरला नव्हता, असे सांगत "आमचा महायुतीचा जोड इतका भक्कम आहे की, आता 'फेविकॉल' कंपनीवाले देखील त्यांच्या जाहिरातीसाठी आमच्याशी संपर्क साधत आहेत," अशी मिश्कील टिप्पणी राणे यांनी केली.

Comments
Add Comment