Saturday, May 23, 2026

Shirdi : साईंच्या शिर्डीचा प्रवास भक्तीपासून तोफखान्यापर्यंत...

Shirdi : साईंच्या शिर्डीचा प्रवास भक्तीपासून तोफखान्यापर्यंत...

शिर्डी : साईबाबांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डीत आंतरराष्ट्रीय ख्यातीचा खासगी तोफखाना कारखाना उभारण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीत २०० एकर भूखंडावर निबे समुहाने खासगी तोफखाना उभारला आहे. या प्रकल्पासाठी एक हजार कोटी रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक करण्यात आली आहे. तोफखाना प्रकल्पात किमान दोन हजार नागरिकांना थेट रोजगार मिळणार आहे. या व्यतिरिक्त निबे समुहाच्या प्रकल्पामुळे १०० पेक्षा जास्त एमएसएमई प्रकल्पांना चालना मिळणार आहे. यामुळे कुशल कर्मचारी - अधिकारी यांना संधी मिळेल. मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होईल. या प्रकल्पाचे संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांनी उद्घाटन केले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

एके काळी प्रामुख्याने शस्त्र आयातदार म्हणून ओळखला जाणारा भारत, पुढील २५ ते ३० वर्षांत जगातील सर्वात मोठ्या संरक्षण निर्यातदारांपैकी एक बनण्याच्या दिशेने स्थिरपणे वाटचाल करत आहे. संरक्षण उत्पादनात खाजगी क्षेत्राचा वाटा ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे, असे याप्रसंगी संरक्षणंत्री राजनाथ सिंह म्हणाले. तर वर्षभर युद्ध झाले तरी शिर्डीच्या प्रकल्पातून या युद्धासाठी पुरेल एवढा दारूगोळा तोफांकरिता पुरविण्याची व्यवस्था होऊ शकते, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

निबे समुहाच्या प्रकल्पात एकूण दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पातून विविध प्रकारच्या ५ लाख तोफगोळ्यांचे वर्षभरात उत्पादन घेतले जाणार आहे. अत्याधुनिक शस्त्र आणि दारूगोळा निर्मितीचे काम प्रकल्पातून चालणार आहे. शिर्डीच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्समध्ये तोफगोळे, ड्रोन, स्फोटके, एरोस्पेस उपकरणे आणि इतर विविध संरक्षण प्रणालींची निर्मिती होणार आहे.

शिर्डीतला खासगी तोफखाना कारखाना ही देशाची आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल सुरू असल्याचे उत्तम उदाहरण आहे. या प्रकल्पात विविध आकारांचे तोफगोळे, ड्रोन, क्षेपणास्त्र आदींची निर्मिती केली जाणार आहे. हा देशातील सर्वात मोठा खासगी तोफखाना कारखाना आहे. शिर्डीच्या प्रकल्पाच्या मदतीसाठी श्रीगोंद्यातील बेलवंडीत विशेष शस्त्रागार उभारले जाणार आहे. बेलवंडीत २००० कोटी रुपये खर्चून ६०० एकरांत पसरलेले महाकाय अत्याधुनिक शस्त्रागार उभारले जाणार आहे.

निबे समुहाच्या तोफखान्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या हजारो रोजगार निर्माण होणार आहेत. या प्रकल्पांमध्ये कुशल कामगारांना प्राधान्य असले तरी अनेक प्रकारच्या कामांमुळे इतरांनाही रोजगारांची संधी मिळणार आहे. देशाच्या संरक्षण सज्जतेसाठी हा एक महत्त्वाचा आणि महाकाय प्रकल्प आहे. शिर्डीच्या प्रकल्पात १५५ मिमी दारुगोळा, १२० मिमी मोर्टार आणि १२५ मिमी तोफगोळ्यांची निर्मिती प्राधान्याने आणि मोठ्या प्रमाणावर केली जाणार आहे. तर बेलवंडीतील शस्त्रागारात प्रामुख्याने टीएनटी, आरडीएक्स आणि एचएमएक्स सारख्या जड लष्करी स्फोटकांसाठा मोठा साठा ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

शिर्डीतला प्रकल्प कार्यरत झाल्यार देशाच्या गरजा पुरविण्यासोबतच दारूगोळ्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात पण करणार आहे. या निर्यातीतून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळणार आहे. देशाचे संरक्षण उत्पादन आता १.२७ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे, तर निर्यातीने विक्रमी पातळी गाठली आहे. संरक्षण निर्यात ३८,००० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जगातील १०० पेक्षा जास्त देशांमध्ये भारताच्या संरक्षण उत्पादनांची निर्यात होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डीतल्या प्रकल्पामुळे भारताच्या संरक्षण विषयक गरजा पूर्ण होण्यास आणि परकीय गंगाजळी वाढण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment