Sunday, May 17, 2026

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश

मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व रस्त्यांची कामे दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत पूर्णत्वास नेण्यात यावीत. रस्त्यांची कामे करताना केवळ तुकड्यांमध्ये नव्हे, तर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण रस्ता दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावा. तसेच, कोणत्याही परिस्थितीत एकही मनुष्य प्रवेशिका (मॅनहोल) उघडी राहणार नाही, याची अत्यंत काटेकोर दक्षता घेण्यात यावी. पावसाळ्यापूर्वी सर्व प्रवेशिकांवर संरक्षक जाळ्या बसविणे अनिवार्य असून, कोणतीही दुर्घटना अथवा अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष सतर्कता बाळगावी,असे निर्देश महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांसह विभागीय सहायक आयुक्तांना दिले आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांची मासिक आढावा बैठक शनिवरी १६ मे २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. त्यावेळी भिडे बोलत होत्या. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (दक्षता) डॉ. एम. देवेंदर सिंह यावेळी उपस्थित होते. तसेच, सर्व सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त, खाते प्रमुख यांचीही या बैठकीस उपस्थिती होती.

http://prahaar.in/2026/05/17/ready-to-resign-if-jarange-is-satisfied-vikhe-patils-big-statement/

मुंबईतील रस्ते विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे म्हणाल्या की, सध्या सुरू असलेली सर्व रस्त्यांची कामे दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत पूर्णत्वास नेण्यात यावीत. रस्त्यांची कामे करताना केवळ तुकड्यांमध्ये नव्हे, तर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण रस्ता दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावा. ज्या ठिकाणी या हंगामात काँक्रीट रस्त्यांची कामे होणे शक्य नाही, त्या ठिकाणी काँक्रीट रस्त्यांप्रमाणेच दर्जेदार मास्टिक रस्ते तयार करण्यात यावेत. हे रस्ते वाहतुकीस सुरक्षित, सुयोग्य आणि एकसमान पातळीचे असावेत; कुठेही उंचसखलपणा राहू नये. आवश्यकतेनुसार मिलिंगची कामे करून रस्त्यांची पातळी संतुलित ठेवावी. रस्ते विकास कामांदरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेण्यात यावी. शाळा, रुग्णालये आणि संवेदनशील ठिकाणी पूर्वी अस्तित्वात असलेले गतिरोधक पुन्हा स्थापित करण्यात यावेत. तसेच, वाहतूक सुरक्षितता अधिक प्रभावी करण्यासाठी थर्मोप्लास्टिक मार्किंग, रंबलर स्ट्रिप्स आदी आधुनिक पर्यायांचाही आवश्यकतेनुसार वापर करण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

मॅनहोल उघडे राहणार नाहीत, याची दक्षता घ्‍या

पावसाळापूर्व तयारी आणि उपाययोजनांबाबत झालेल्या बैठकीत संभाव्य पावसाचे पाणी साचण्‍याची ठिकाणे, पाणी उपसा यंत्रणा, उपसा पंप तसेच अन्य आपत्कालीन उपकरणांच्या सुसज्जतेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या की, सखल भागांमध्ये पाणी साचणाऱ्या ठिकाणी महानगरपालिकेकडून कायमस्वरूपी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येते. मात्र, अशा ‘क्रॉनिक स्पॉट्स’वर दीर्घकालीन आणि शाश्वत उपाययोजना करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात यावा.

यंदाच्या पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण होणे शक्य नसले, तरी पुढील वर्षीच्या पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने स्पष्ट कार्यपद्धती, कालबद्ध नियोजन आणि अंमलबजावणी आराखडा निश्चित करण्यात यावा. तसेच, कोणत्याही परिस्थितीत एकही मनुष्य प्रवेशिका (मॅनहोल) उघडी राहणार नाही, याची अत्यंत काटेकोर दक्षता घेण्यात यावी. पावसाळ्यापूर्वी सर्व प्रवेशिकांवर संरक्षक जाळ्या बसविणे अनिवार्य असून, कोणतीही दुर्घटना अथवा अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष सतर्कता बाळगावी. प्रभागांच्‍या सहायक आयुक्‍तांनी मध्‍यवर्ती यंत्रणांशी समन्‍वय साधून जाळ्या बसवाव्‍यात. मुंबईत विविध मोठ्या पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू असताना महानगरपालिकेच्या पाणी, जलनिस्सारण, वीज व इतर सेवा-सुविधांच्या वाहिन्या सुरक्षित व सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित अधिकाऱ्यांनी नियमितपणे करून घ्यावी, असे निर्देशही भिडे यांनी दिले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >