Friday, May 15, 2026

मान्सून २६ मे पर्यंत केरळमध्ये आणि ६ जून पर्यंत कोकणात ?

मान्सून २६ मे पर्यंत केरळमध्ये आणि ६ जून पर्यंत कोकणात ?

नवी दिल्ली : उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, यंदा नैऋत्य मान्सून वेळेआधीच केरळ मध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार २६ मे रोजी मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचू शकतो. यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत दक्षिण अंदमान समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमान-निकोबार बेटांमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. १६ मेच्या आसपास मान्सून अंदमान परिसरात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर २६ मे रोजी मान्सून केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पुढील ४ते ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, माहे आणि दक्षिण कर्नाटकात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १३ ते १९ मे दरम्यान ईशान्य भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागांत ताशी ५० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्याने त्याचा परिणाम पुढील काही दिवस देशातील हवामानावर दिसून येणार असल्याचे IMD ने स्पष्ट केले आहे.

देशातील अनेक भागांत उष्णतेची लाट कायम

एकीकडे मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असताना, दुसरीकडे उत्तर-पश्चिम, पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम आहे. राजस्थानमधील बारमेर येथे देशातील सर्वाधिक ४८.३अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

६ जूनपर्यंत कोकणात मान्सूनची शक्यता

आयएमडी च्या अंदाजानुसार, मान्सून ५ जूनपर्यंत गोव्यात दाखल होण्याची शक्यता असून ६ जूनपर्यंत तो कोकणात पोहोचू शकतो. तसेच ७ जूनपर्यंत पुण्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात कोणताही मोठा अडथळा येण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा