नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान संपले आहे. पहिल्या टप्प्यात ९२ टक्क्यांपेक्षा जास्त आणि दुसऱ्या टप्प्यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. यामुळे ममता बॅनर्जी सत्ता राखणार की भाजपची सत्ता येणार यावरून चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलचे अंदाज येण्यास सुरुवात झाली आहे. प्रमुख संस्थांच्या एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार आहे.
प्रजा पोलच्या अंदाजानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजप १७८ ते २०८ जागा जिंकेल तर पोल डायरीच्या अंदाजानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजप १४२ ते १७१ जागांवर बाजी मारेल. मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार भारतीय जनता पार्टी १४६ ते १६१ जागांवर विजयी होईल. चाणक्य स्टॅटेजीझच्या एक्झिट पोलने भाजप १५० ते १६० जागा जिंकेल असा अंदाज व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालबाबतच्या जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार भाजपला १५० ते १८० जागा जिंकता येतील. तसेच पीएमएआरक्यूच्या पश्चिम बंगालबाबतच्या एक्झिट पोलनुसार भाजप १५० ते १७५ जागा जिंकेल.
पश्चिम बंगालच्या विधानसभेत एकूण २९४ जागा आहेत. यामुळे १४७ किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकल्यास स्पष्ट बहुमताच्या जोरावर भाजप सत्ता स्थापन करू शकेल. एक्झिट पोलचे अंदाज पश्चिम बंगालमध्ये भाजप बहुमत मिळवेल असाच अंदाज व्यक्त करत आहेत.
पश्चिम बंगालमधील सध्याची स्थिती
पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. २९४ पैकी २२१ जागांवर विजय मिळवत तृणमूल काँग्रेसने २०२१ मध्ये राज्यात सत्ता स्थापन केली. भाजपने २०२१ च्या निवडणुकीत ६५ जागांवर विजय मिळवला होता. ही पश्चिम बंगालमधील भाजपची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
मतदानाची वेळ संपल्यानंतर कोण करू शकते मतदान ?
पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्याचे मतदान संपले आहे. नियमानुसार संध्याकाळी पाच वाजता मतदानाची वेळ संपली. आता जे मतदार रांगेत असतील फक्त त्यांनाच मतदान करता येईल. नव्याने कोणालाही मतदानासाठी रांगेत उभे राहण्याची परवानगी नसेल. यासाठी संबंधित मतदान केंद्रातले निवडणूक अधिकारी शेवटच्या मतदाराची नोंद करून ठेवतील, त्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्तात शेवटच्या मतदाराने हक्क बजावेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे.






