Thursday, April 23, 2026

मनुष्य जन्म

मनुष्य जन्म

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै

आपण सध्या प्रबोधनासाठी घेतलेला विषय म्हटला तर अत्यंत कठीण आहे. म्हटले तर खूप सोप्पा आहे. तो म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे, म्हणजेच अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचे आहे. म्हणूनच हा विषय आपण निराळ्या प्रकारे वेगवेगळ्या अंगाने पाहत आहोत. म्हणजेच संचित, प्रारब्ध, क्रियमाण या संकल्पनांतून. ह्या शब्दांचे नेमके अपेक्षित अर्थ आपल्याला समजत नाहीत, म्हणून आपल्याला जीवन सुखावह करता येत नाही, समृद्ध करता येत नाही, यशस्वी करता येत नाही. मी मागल्या खेपेस सांगितले, इथे कुठेही अंधश्रद्धा नाही. पण काही गोष्टी अशा आहेत की त्या प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही. तुम्हाला भूक लागली तर ती प्रयोगशाळेत सिद्ध करता येते का? पोटात कळा येऊ लागल्या तर त्या प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही. सर्वच गोष्टी प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही. संचित घेऊन माणूस जन्माला येतो हे प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नसले तरी त्याला अनुमान प्रमाण आहे. अनुभव प्रमाण आहे.

ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे की , "मनुष्य जाणिजे बोले, वृक्ष जाणिजे फळे; भोग जाणिजे केले, पूर्वजन्माचे". ही गोष्ट ध्यानात घेतली तर माणसाचे संचित म्हणजे गोदाम आहे. ह्या गोदामामध्ये आधीचे साठलेले पापपुण्य हा माल येऊन पडतो आणि तोच पापपुण्याचा भाग त्याच्या वाट्याला येतो. अगदी सुरुवातीला तो नैसर्गिक पद्धतीने येतो. हे जन्माला आल्यापासून ते समजायला लागेपर्यंत नैसर्गिक पद्धतीने येतो. हा संचितातील पापपुण्याचा भाग जो वाट्याला येतो त्याला प्रारब्ध म्हणतात. हे प्रारब्ध प्राथमिक अवस्थेत निसर्गाच्या नियमाप्रमाणे येते. पुढे काय होते? आपण जसेजसे मोठे होतो तसे आपल्याला संस्कार मिळतात, शिक्षण मिळते, शिकवण मिळते. ह्या संस्कार, शिकवण, शिक्षण ह्याप्रमाणे आपण विचार करतो, उच्चार करतो, आचार करतो, कृती करतो. हे संस्कार घरातून मिळतात, शाळा, कॉलेजात मिळतात, धर्मसंस्थेतून मिळतात. समाजातून मिळतात. हे जे संस्कार होतात त्या संस्काराप्रमाणे आपले विचार, उच्चार, आचार निर्माण होतात व त्याप्रमाणे माणसाच्या बुद्धीची जडणघडण करण्याचे काम हे संस्कार करतात. म्हणून हिंदू संस्कृतीत मूल जन्माला आले की त्याच्यावर त्याप्रमाणे संस्कार होतात. मुस्लीम संस्कृतीत मूल जन्माला आले की त्याच्यावर त्याप्रमाणे संस्कार होतात. अशा तऱ्हेने निरनिराळ्या संस्कृतीत मूल जन्माला येते तेव्हा त्यातून संस्कार, शिक्षण व शिकवण मिळते. प्रत्यक्षात मूल जन्माला येते तेव्हा त्याला निवड किंवा पसंतीचा अधिकार नसतो. हिंदू धर्म की मुस्लीम धर्म असा पर्याय नसतो. संस्काराचे महत्त्व अधोरेखित करताना एका श्लोकात असे म्हटले आहे की "जन्मना जायते शूद्र:, संस्काराद द्विज उच्यते।|" याचा अर्थ असा की कोणतेही मूल जन्माला येते तेव्हा ते कोरे असते, अज्ञानी असते. ते ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आले तरी किंवा वैश्याच्या पोटी जन्माला आले तरी. कोणाच्याही पोटी कोणत्याही धर्मात जन्माला आले तरी ते सारखेच. मग त्यावर जे संस्कार होतात व त्यातून त्याला जे ज्ञान मिळते त्यातच त्याचा दुसरा जन्म होतो. म्हणजेच पहिला जन्म आईच्या पोटातून होतो व दुसरा जन्म संस्कारातून होतो.

Comments
Add Comment