Friday, April 10, 2026

Bmc News : येत्या मे महिन्यापासून मुंबईकरांवर पाणीकपात

Bmc News : येत्या मे महिन्यापासून मुंबईकरांवर पाणीकपात

किमान १० टक्के होणार पाणी पुरवठ्यात कपात

मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये सध्या ३५ टक्के पाणी साठा असून मागील दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणी साठा चांगल्याप्रकारे असला तरी प्रत्यक्षात पावसाळ्याचे गणित पाहता मुंबई महापालिकेला पाणीकपात करण्याची गरज भासणार आहे. त्यातच राज्य शासनाने महापालिकेला ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिल्यामुळे येत्या १ मेपासून मुंबईत किमान १० टक्के कपात करण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे येत्या महिन्यात पुढील पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याच्यादृष्टीकोनातून ही कपात जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असून सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा,भातसा, विहार आणि तुळशी यासर्व धरणांमध्ये केवळ ५ लाख २० हजार ६९८ दशलक्ष लिटर पाण्याचा साठा आहे. टक्केवारीच्या तुलनेत हा पाणी साठा ३५ टक्के एवढा आहे. त्यामुळे सध्या असलेला पाणी साठा हा १५ जूनपर्यंत पुरणार असून पुढील कालावधीत पाऊस लांबणीवर पडण्याचाही हवामान खात्याचा अंदाज आहे. अल लिनोच्या वादळी संकटामुळे पाऊस लांबणीवर जाण्याचीही शक्यता असल्यामुळे भविष्यात पावसाळ्यात सर्व धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा होईपर्यंत या पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. त्यादृष्टीकोनातून महापालिका जल अभियंता विभागाने पाणीकपात करण्याचा विचार केला आहे. त्यासाठी कमीत कमी १० टक्के पाणीकपात करण्याचा विचार करण्यात आला असून लवकर हा प्रस्ताव लागू करुन सर्वांच्या मान्यतेने याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

मागील वर्षी पाण्याचा साठा कमी झाल्यानंतरही शासनाने भातसा धरणातील अतिरिक्त पाणी देण्याची तयारी दर्शवल्यामुळे पाणीकपात करण्यात आली नव्हती. परंतु यंदा पाऊस लांबणीवर पडण्याची भीती असल्यामुळे शासनाकडून भातसाचेही अतिरिक्त पाणी मिळण्याची शक्यता नाही. याउलट महापालिकेला आपल्या धरणातील राखीव पाणी साठाही वापरण्याची गरज भासणार आहे. याचीही मंजुरी प्राप्त करून या पाण्याचा वापर करण्याची रणनिती आखली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांना येणाऱ्या काळात किमान दहा टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागेल,असा अंदाज वर्तवला जात आहे.

दिनांक ९ एप्रिलच्या दिवसापर्यंतचा पाणी साठा

सन २०२६ : ५ लाख २० हजार ९९८(३५.९८)

सन २०२५ : ४ लाख ७० हजार १०७(३२.४८)

सन २०२४ : ३ लाख ९० हजार ३४७(२६.९८)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >