तिनसुकिया : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रविवारी मध्यरात्री दोन नंतर दहशतवाद्यांनी हल्ला सुरू केला. दहशतवाद्यांनी कॅम्पला लक्ष्य करून मॉर्टरद्वारे पाच आरपीजी गोळे डागले. यातील चार गोळे कॅम्पच्या आत फुटले. या हल्ल्यात कॅम्पमधील चार जवान जखमी झाले. जखमी कमांडोंवर कॅम्पमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जवान जखमी होण्याव्यतिरिक्त कॅम्पमध्ये आणखी काही नुकसान झाले आहे की नाही हे अद्याप समजलेले नाही. पोलीस कमांडो कॅम्पवरील हल्ल्याचा तपास सुरू आहे.
तिनसुकियाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मयंक कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे एक पथक घटनेनंतर तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या हल्ल्यानंतर तिनसुकिया जिल्हा आणि अप्पर आसामच्या इतर भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
याआधी ऑक्टोबर २०२५ मध्ये दहशतवाद्यांनी तिनसुकियातील काकोपाथर येथील भारतीय लष्कराच्या छावणीवर गोळीबार केला होता, ज्यात तीन जवान किरकोळ जखमी झाले होते. मध्यरात्रीच्या सुमारास हल्लेखोरांनी एका धावत्या वाहनातून छावणीवर गोळीबार केला होता. लष्कराने तात्काळ प्रत्युत्तर दिले होते. पण हल्लेखोर वाहनातून सुसाट वेगाने पळून गेले होते. बंदी घातलेल्या युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम-इंडिपेंडंट या दहशतवादी गटाने लष्करी छावणीवर हल्ला केला होता. आता पोलिसांच्या कॅम्पवर झालेल्या हल्ल्यातही बंदी घातलेल्या युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम-इंडिपेंडंट या दहशतवादी गटाचाच हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
आसामध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात ९ एप्रिल रोजी मतदान होईल आणि ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आसामच्या नागरिकांमध्ये दहशत पसवण्याच्या उद्देशानेच पोलीस कमांडो कॅम्पवर हल्ला करण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.






