मुंबई : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागात परवान्यांच्या नूतनीकरणासाठी सुरू असलेल्या लाचखोरीच्या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या गंभीर प्रकारावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री नरहरी झिरवळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, "हा प्रकार अत्यंत गलिच्छ असून या प्रकरणातील सत्य लवकरच चौकशीतून बाहेर येईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
औषध विक्रेत्यांच्या परवान्यांमध्ये त्रुटी आढळल्यास एफडीएचे इन्स्पेक्टर दुकानदारांचा परवाना निलंबित करतात. या निलंबनाविरुद्ध मंत्र्यांकडे दाद मागण्याची कायदेशीर तरतूद आहे. मात्र, या प्रक्रियेत मंत्र्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे खासगी सचिव (पीए) रामदास गाडे आणि लिपिक डेरिंगे हे स्वतः अपील ऐकत असल्याचे व परवाना पूर्ववत करण्यासाठी लाखो रुपयांची मागणी करत असल्याचे स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले.
यावर भाष्य करताना झिरवळ म्हणाले की, "ज्यांनी हे स्टिंग ऑपरेशन केले, त्यांनी ते शत्रू म्हणून केले नसून कामात होणाऱ्या त्रासामुळे सत्य बाहेर आणले आहे. अशा घटनांमुळे मानसिक त्रास होतो, मात्र आता सखोल चौकशी सुरू असून 'दूध का दूध आणि पानी का पानी' होईल."
कर्मचाऱ्यांना दिली तंबी
झिरवळ म्हणाले, "राज्याच्या गरजेचा माणूस गेला याचे दुःख असताना, माझ्या दालनात असा प्रकार घडणे अत्यंत चुकीचे आहे. मी माझ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्पष्ट तंबी दिली आहे की, पारदर्शक पद्धतीने काम करा. कुठेही प्रशासनाला कलंक लागेल असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही". दरम्यान, सुनेत्रा वहिनींना दादांच्या (अजित पवार) जागी योग्य स्थान मिळावे, ही सर्वांचीच भावना असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.







