Thursday, February 5, 2026

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार प्रचार सुरु आहे. यातच लोकांचा प्रतिसाद महायुतीला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा शंभर टक्के निकाल लागेल. तसेच जिल्ह्यात शंभर टक्के महायुतीचा विजय होईल असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

 

'सिंधुदुर्गचा निकाल महाराष्ट्रात एक नंबरचा असेल'

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे म्हणाले, "लोकांचा प्रतिसाद महायुतीला आहे. जिल्हा परिषदेचे 50 आणि पंचायत समिती 100 असे सगळे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा शंभर टक्के निकाल लागेल. येणाऱ्या 9 तारखेला सिंधुदुर्गचा निकाल महाराष्ट्रात एक नंबरचा असेल.

पुढे बोलताना, सभांना अतिशय पोषक वातावरण आहे, महायुतीचे सर्व उमेदवार सक्षमपणे लोकांसमोर जात आहेत, मात्र विरोधी उमेदवार शेंबड्यासारखे रडण्यापलीकडे काही करत नाहीत अशी टीका पक्षावर राणेंनी केली आहे. आमच्यावर टीका कोणत्या पद्धतीने करावी हे त्यांना माहित नाही. त्यांचा स्वतःवर विश्वास नाही आणि त्यांच्याकडे निवडून देण्याचं स्पष्ट कारण नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

 

'सिंधुदुर्गची जनता महायुतीसोबत'

पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, "निवडणुका आहेत, त्यामुळे थोड्या कुरघोड्या झाल्या नाहीत तर मजा नाही. आम्ही सगळे एकत्र येऊन जे अतृप्त आत्मे आहोत, त्यांच्याशी बोलत आहोत. शेवटी ते आमचेच कार्यकर्ते आहेत. कोणीही कितीही वातावरण खराब केलं तरी सिंधुदुर्गची जनता महायुतीसोबत आहे. जनता आम्हालाच आशीर्वाद देईल."

 

'आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत आहोत'

पुढे बोलताना, आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत आहोत. सत्तेत असताना विरोधकांनी सिंधुदुर्गसाठी काय दिले, हे प्रश्न जनता विचारणार आहे. ते तोंड लपवत सगळीकडे फिरत आहेत. विरोधकांचा एकही राजकीय नेता सिंधुदुर्गात फिरकला नाही. ते मानसिक पद्धतीने युद्ध हरलेले आहेत. एकतर्फी विजय आमच्या महायुतीचा होत असताना दिसेल असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

मंत्री नितेश राणे यांनी म्हटले की, "मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. माझ्या कारकिर्दीत सिंधुदुर्गचं वातावरण मी खराब होऊ देणार नाही. महायुतीच्या विरोधात जो कोणी भूमिका घेईल, त्याला दहा तारखेला माझ्यासोबत चहा पिण्यासाठी अपॉइंटमेंट देईन; हे त्यांनी लक्षात ठेवावे. आमच्याकडे विकासाचा अजेंडा आहे, आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत. आम्हीच उद्या निधी देऊ शकतो. सगळ्या बाजूने सक्षम असल्याने उर्वरित जागा सुद्धा आम्ही जिंकू."

Comments
Add Comment