Thursday, December 4, 2025

मुंबईतील सर्वाधिक खोल शहरी बोगद्याचे काम सुरू

मुंबईतील सर्वाधिक खोल शहरी बोगद्याचे काम सुरू

‘ऑरेंज गेट टनेल’ जून २०२८ पर्यंत पूर्ण करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; ७०० इमारतींच्या खालून भुयार खणणार

मुंबई : भुयारी मेट्रोमुळे सोपा झालेला मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार असून, मुंबईतील सर्वाधिक खोल शहरी बोगद्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी ‘ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह’ भूमिगत बोगदा प्रकल्पाचा शुभारंभ झाला असून, त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास वेळ निम्म्यावर येणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे; मात्र, तो जून २०२८ पर्यंत म्हणजे सहा महिने आधीच पूर्ण करण्याचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. जवळपास ७०० इमारती, शेकडो वर्षांपूर्वीच्या हेरिटेज वास्तू आणि मेट्रो-३ च्या ५० मीटर खालून जाणारा हा बोगदा खणण्याची जबाबदारी लार्सन अँड टुब्रो (एल अॅण्ड टी) या नामांकित कंपनीकडे सोपवण्यात आली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यावेळी टनेल बोरिंग मशीनचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमीन पटेल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्त रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, “ मुंबईतील नागरिकांना नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी प्रचंड वळसा घालावा लागतो. या दोन्ही समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून ऑरेंज गेट टनेल’ची संकल्पना आकाराला आली.

मुंबईकरांना काय फायदा होणार?

  1. पूर्व-पश्चिम उपनगर ते दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाचा प्रवास १५-२० मिनिटांनी कमी
  2. इंधन व वेळेचीप्रचंड बचत
  3. वायू व ध्वनी  प्रदूषणात घट
  4. कोस्टल रोड, वरळी-शिवडी सी-लिंक आणि अटल सेतूशी थेट जोडणी

वरळी-शिवडी सी-लिंक आणि कोस्टल रोडची जोडणी पूर्ण झाल्यानंतर पश्चिम उपनगरातून नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी दोन जलद पर्याय उपलब्ध होतील. हा प्रकल्प मुंबईकरांचे दररोजचे हजारो तास वाचवेल आणि मुंबईच्या वाहतुकीच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Comments
Add Comment