भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर रोजी या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे मीरा भाईंदर शहर देशातील पहिले फ्री वाय फाय शहर ठरणार आहे. पालिका मुख्यालयात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत सांगितले की, ''विनामूल्य वाय फाय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी १५ डिसेंबर रोजी निविदा प्रक्रिया सुरू करणार असून यासाठी अंदाजे १० कोटी रुपये खर्च येईल. त्यासाठी महापालिकेकडे निधी कमी पडल्यास सरकारकडून विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल'' असेही सरनाईक यांनी सांगितले. शहरातील शाळा, महाविद्यालय, मीरा रोड आणि भाईंदर रेल्वे स्थानक, लता मंगेशकर नाट्यगृह, शहरातील सरकारी आणि खाजगी रुग्णालय सदर सेवा विशेष उपयुक्त ठरेल. पत्रकार परिषदेला पालिका आयुक्त राधा विनोद शर्मा, अति. आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त सचिन बांगर, शहर अभियंता दीपक खांबीत उपस्थित होते.