रत्नागिरी : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले. आयोगाने ही घोषणा करुन काही दिवस होत नाहीत तोच राज्यातील एका गावाने मोबाईल नेटवर्कसाठी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. गावात मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट उपलब्ध नाही. यामुळे २१ व्या शतकाला अनुसरुन दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे. जगाशी संपर्क ठेवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशी तक्रार करुन ग्रामस्थांनी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तळवडे या गावाने मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटसाठी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट द्या मगच मत मिळवा, अशी ठाम भूमिका तळवडेतल्या ग्रामस्थांनी घेतली आहे. नो नेटवर्क, नो एंट्री अशी ठाम भूमिका तळवडेतल्या ग्रामस्थांनी घेतली आहे.गावकऱ्यांच्या भूमिकेला राजकीय पक्षांकडून कसा प्रतिसाद मिळतो याकडे अनेकांचे लक्ष आहे.