
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून चिंता व्यक्त
नवी दिल्ली : देशात घुसखोरीमुळे मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे, असे महत्त्वपूर्ण विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले.
शुक्रवारी दिल्ली येथे एका कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी भारतात मुस्लीम समाजाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे सांगून यामागचे कारणही सांगितले. “मुस्लीम समाजाची लोकसंख्या २४.६ टक्क्यांनी वाढली आहे. तर हिंदूंची लोकसंख्या ४.५ टक्क्यांनी कमी झाली आहे. ही लोकसंख्या वाढ प्रजनन दरामुळे वाढलेली नाही, हे मला इथे सांगायचे आहे. तर लोकसंख्या वाढीचे कारण घुसखोरी आहे”, असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी देशातील निवडणुकींचाही उल्लेख करत ते म्हणाले की, जे भारतीय नागरिक आहेत, तेच निवडणुकीत मतदान करू शकतात.
लोकसंख्येच्या असमतोलाबाबात त्यांनी चिंता व्यक्त केली. धर्माच्या कारणांमुळे भारताची फाळणी झाली, यावर जोर देताना ते म्हणाले की, भारताच्या दोन्ही बाजूंना पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यामुळे दोन्ही बाजूंनी भारतात घुसखोरी होत राहिली. यामुळे भारताच्या लोकसंख्येत मोठे बदल झाले, असे त्यांनी सांगितले.
अमित शहा पुढे म्हणाले, “मी तुम्हाला घुसखोर आणि निर्वासित यांच्यातील फरक सांगतो. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये हिंदू लोकसंख्या जितकी कमी झाली, त्यापैकी अनेकांनी भारतात आश्रय घेतला. तसेच भारतात मुस्लिमांची लोकसंख्या वाढीमागे प्रजनन दर हे कारण नसून मुस्लिमांची घुसखोरी कारणीभूत आहे.” देशात होणाऱ्या घुसखोरीचा प्रयत्न आता मतदार यादीतही होत आहे. यामुळे संविधानाचा आत्मा हरविण्याची भीती आहे. त्यामुळे मतदानाचा अधिकार हा फक्त भारतीय नागरिकांनाच असला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.