Tuesday, October 7, 2025

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले!

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले!
संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानचे वागणे हे स्वत:चे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे सांगावे ओरडून अशा प्रकारचे असल्याचे भारताने उघड केले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्येही पाकिस्तानने हेच करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वथानेनी हरीश यांनी पाकिस्तानचे वास्तव सर्वांना सांगितले. पाकिस्तान हा असा देश आहे, जो स्वतःच्या लोकांवर बॉम्ब टाकतो. तसेच आपली कृती लपवण्यासाठी जगासमोर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत राहतो, असे म्हणत पार्वथानेनी हरीश म्हणाले. संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी मंडळाच्या सायमा सलीम यांनी परिषदेत काश्मीरी महिलांच्या सुरक्षेबाबत टिपणी केली. त्या म्हणाल्या, काश्मीरी महिला अनेक दशकांपासून त्रास सहन करत आहेत. त्यांचा वापर युद्धासाठीचे शस्त्रास्त्र म्हणून केला जात आहे आणि वर्षानुवर्षे त्यांना लैंगिक हिंसाचार सहन करावा लागत आहे." या टिप्पणीवरुन भारताने पाकिस्तानला धारेवर धरले. पाकिस्तानने आजवर फक्त जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरुन राजकारण केले आहे. मात्र आजवर भारताच्या सीमाभागावर कब्जा केल्याचे पाकिस्तान बोलत नाही. पाकिस्तानच्या सैन्याने १९७१ मध्ये ऑपरेशन सर्चलाइटमध्ये आपल्याच देशातील चार लाख महिलांवर सामूहिक बलात्कार केला आणि त्यांची हत्या केली. तसेच आजवर पाकिस्तानने केवळ जगाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केला, असे भारताचे स्थायी प्रतिनिधि पार्वथानेनी हरीश यांनी परिषदेत सांगितले. यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानची पंचाईत झाली. संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी प्रतिनिधीने सांगितले की महिला, शांतता आणि सुरक्षा अजेंड्यावर भारताची कामगिरी उत्तम आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैन्यात भारताच्या डॉ. किरण बेदी यांनी पोलीस अधिकारी म्हणून केलेली कामगिरी कौतुकास्पद आणि सर्वश्रूत आहे. त्या काही काळ संयुक्त राष्ट्रांच्या पोलीस दलाच्या प्रमुख होत्या. भारताने कायमच महिलांचा सन्मान केला आहे महिलांच्या प्रगतीसाठी कार्य केले आहे. याउलट स्थिती पाकिस्तानची असल्याचे भारताने ठासून सांगितले.
Comments
Add Comment