विद्यार्थ्यांना आले ई-मेल्स, काही विद्यार्थी तर चक्क नापास
पुणे : परीक्षा मग ती कोणतीही असो दहावी, बारावी किंवा एमपीएससी (MPSC), यूपीएससी (UPSC) सारख्या स्पर्धात्मक परीक्षा, हल्ली पेपर फुटल्याच्या (Question paper leaked) बातम्या सतत कानावर येतात. परीक्षांमध्ये असे गैरवर्तवणुकीचे प्रकार होत असताना आता निकालाबाबतच मोठी चूक झाल्याची बातमी समोर आली आहे. मात्र, हा नक्की प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे की कोणीतरी मुद्दाम ही गोष्ट केली याबाबत खुलासा होऊ शकलेला नाही.
प्राध्यापक पदासाठीची राज्य पात्रता परीक्षा अर्थात ‘सेट’चा (SET) निकाल दोन दिवस आधीच फुटल्याची माहिती समोर आली आहे. या निकालाबाबत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना काल ई-मेल प्राप्त झाला. जाहीर केलेल्या तारखेनुसार निकाल २८ जूनला म्हणजेच उद्या लागणे अपेक्षित होते, मात्र तो दोन दिवस आधीच म्हणजेच काल २६ जूनला लागल्याने विद्यार्थी गोंधळात पडले. या निकालात केवळ संपूर्ण गुण कळवण्यात आले असून विषयनिहाय गुणांचा कुठेही उल्लेख केलेला नाही. अनेक विद्यार्थ्यांच्या निकालात अनुत्तीर्ण छापून आले आहे, त्यामुळे ते नाराज आहेत.
सोबतच आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे काहींना प्राप्त झालेले ई-मेल खुलेच होत नव्हते, त्यामुळे ते अधिक संभ्रमात पडले. विशेषतः भौतिकशास्त्र विषयातील बहुतेक विद्यार्थ्यांना या संदर्भातील ई-मेल प्राप्त झाले आहेत. परंतु हा निकाल नक्की खरा आहे की खोटा, याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
सेट भवनकडून तातडीची उपाययोजना
महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सेट परीक्षेचे आयोजन करण्यात येते. यंदा २६ मार्च रोजी ही परीक्षा पार पडली. मात्र २८ तारखेला लागणारा निकाल २६ तारखेलाच जाहीर झाला. त्यामुळे वेळीच झालेल्या चुकीची दखल घेत सेट भवनकडून तातडीची उपाययोजना करण्यात आली आहे.
या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चौकशी केली असता ते म्हणाले, ‘‘या संबंधी तातडीने चौकशी करण्यात येईल. उमेदवारांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरण्याचे काम नाही. परीक्षेचा अधिकृत निकाल २८ जून रोजीच सहा वाजण्याच्या पूर्वी घोषित करण्यात येईल.’’ यावेळेस प्रथमच उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर निकाल कळविण्यात येणार असल्याने त्या प्रक्रियेतील ही तांत्रिक चूक असावी, असा अंदाजही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, घडलेल्या प्रकारामुळे उमेदवार मात्र हवालदिल झाले आहेत. दरम्यान, उमेदवारांनी अधिकृत निकालाचीच वाट पाहावी व या निकालावर विश्वास ठेवू नये, असा सल्ला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला.